Tuesday, July 14, 2015

रानभाज्यांची चवच न्यारी....

पूर्वीच्या काळी शेतीत नुकसान झाले तर शेतकरी कधी खचत नव्हते. समस्यांना तोंड देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. विविध पर्यायही त्यांनी यासाठी योजले होते. पावसाळ्यात अती पावसामुळे बऱ्याचदा नुकसान होई. अशा परिस्थितीत काय खायचे हा मोठा प्रश्‍न असायचा? विशेषतः पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले तर मोठी समस्या भेडसावत होती. जेवनात भाजी नसेल तर जेवन खाणार काय? दरवर्षीच ही समस्या भेडसावत असे. नेहमीच भेडसावणाऱ्या या समस्यावर त्यांनी विविध उपायही योजून ठेवले होते. उन्हाळ्यातच मुरांबे, पापड, शेवया तयार करून पावसाळ्यात गरजेच्या वेळी त्या उपयोगात आणत असत. उपासमारीवर केलेली त्यांनी उपाययोजना खरचं त्यांच्या कामातील दूरदृष्टी दाखवते. शेतात सर्व भाजीपाला नुकसान झाला तरी ते कधी खचून जात नसत. अशा काळात ते पातरी, घोळ आदी पेरणी न करता उगवणाऱ्या राणभाज्यांचा वापर ते करून जीवन जगत असत. कोणत्याही गोष्टीची ते तमा बाळगत नसत. प्राप्त परिस्थितीशी धैर्याने ते सामोरे जात असत. मानसिकता ढळू देत नसत. यामुळेच पूर्वीच्या काळी आत्महत्या होत नसत. आता आपण मात्र वेगळीच प्रतिष्ठा जपत आहोत. तणे भाज्या म्हणून खाण्यात आपणास कमीपणाचे वाटते. पण त्याची पौष्टीकता कधी आपण विचारातच घेतली नाही. पूर्वीच्याकाळी हेच खाऊन ते धष्टपुष्ट जीवन जगत होते हा विचारच आपल्या मनात येत नाही.
यासाठी आता या राणभाज्या आपल्या भोजनात कशा येतील याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पर्वाच कोल्हापूरातील "निसर्ग मित्र'ने राणभाज्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याला भेट देण्याचा योग आला. तेथे त्यांनी विविध पाककृती तयार करुन ठेवल्या होत्या. त्यात नीरफणसापासून तयार केलेली पाककृतीही होती. इतकी सोपी पाककृती आहे. हे समजल्यावर तर आश्‍चर्यच वाटलं. विशेष म्हणजे याचा स्वाद उत्कृष्ट होता. आपल्या आसपास इतकी फळे आहेत पण त्यांचा स्वाद आपण कधी घेत नसतो. हेही यावेळी माझ्या लक्षात आले. यासाठी राणभाजांचा अभ्यास आपण करायलाच हवा.

नीरफणसापासूनची पाककृती
नीरफणसाचे काप तयार करून घ्यायचे. या कापास हळद, रवा, तिखट, मीठ, हिंग पावडर लावून हा काप तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा. इतका स्वादिष्ट पदार्थ आहे, हे खाल्ल्याशिवाय आपणास कसे लक्षात येईल. यासाठी याचा आस्वाद घ्याच.

ओव्याच्या पानाची भजी
आता तेथे जाऊन भाज्यांचा आस्वाद घेतल्यावर स्वतः करण्याचा मोह होणार हे निश्‍चितच? तेथेच समजले. ओव्याची जाड पाने भजीमध्ये वापरुन भजी करता येतात. घरात परसात ओव्याचे रोप आहे. त्याला आलेली पाने तोडून भजी करून पाहिली. अप्रतिम झाली. त्या पानांचा स्वाद त्या भज्यामध्ये उतरतो. त्यामुळे भजी स्वादिष्ट होतात. आता ही सुद्धा भजी तुम्ही करून बघाच.....

Saturday, June 27, 2015

निसर्ग मित्र' जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील "निसर्ग मित्र' ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा जपत या संस्थेने गाव परंपरेचा अभ्यास करत त्या जपल्या जाव्यात, यासाठी राबविलेले उपक्रम ग्रामविकासाला मार्गदर्शक आहेत. 

राजेंद्र घोरपडे

सन 1980 च्या प्रारंभी पक्षी निरीक्षण, जंगल भ्रमण, वृक्षारोपण, परसबाग आदींच्या छंदातून कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र आल्या. यात अनेकांनी पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार मांडला. यातूनच "निसर्ग मित्र' या संस्थेची संकल्पना सुचली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले यांनी 1982 मध्ये ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये डॉ. जय सामंत, वसंतराव शिरगावकर, डॉ. पुष्पा बेर्डे, वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन, डॉ. विजय करंडे, आदम मुजावर, शेखर पडळकर आदींचा सहभाग होता. सन 1998 मध्ये डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी निसर्ग मित्रतर्फे विविध उपक्रम सुरू केले. संस्थेतर्फे रंकाळा बचाव, पंचगंगा प्रदूषणाबाबत जागृती, सह्याद्री बचाव, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, वृक्ष दत्तक उपक्रम, नैसर्गिक रंग निर्मिती प्रकल्प, देवराया वाचविण्यासाठी मोहीम आदी विविध चळवळी राबविल्या जातात. अशा विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाते. केवळ गप्पा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून प्रबोधन हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेमध्ये कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन समिती, हरितसेना, कोल्हापूर जिल्हा बांबू मिशन हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

रानभाज्यांचे बीजसंवर्धन ः
पावसाच्या पाण्यावरच रानभाज्या येतात. पण केवळ पावसावर रानभाज्या येतात की त्याची लागवडही केली जाऊ शकते, याबाबत निसर्ग मित्रतर्फे विविध प्रयोग सुरू आहेत. यासाठी परसबाग कार्यशाळा संस्थेतर्फे घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 30 कुटुंबांना 30 प्रकारच्या रानभाज्यांचे बियाणे देण्यात आले. भारंगी, टाकाळा, काटेमाठ, राजगिरा, कुरडू, घेटूळी (पूनर्नवा), वाघाटी, केना, आघाडा, तांदळी, वायवर्णा, चांगेरी (आंबुशी), रानउडीद, घोळ, भोकर, गुळवेल आदी रानभाजांचा यामध्ये समावेश आहे. या भाजांची लागवड परसबागेत, टेरेसवर करून त्याचे उत्पादित बीज इतर 29 कुटुंबांना वाटले जाते. जेणेकरून सर्वांकडे या रानभाज्यांच्या बीजाचे संवर्धन होते. बचत गटाच्या माध्यमातूनही रोपवाटिका करून रानभाज्यांच्या बीजसंवर्धनाचेही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

देशी वृक्षांचे बीज संकलन
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने (22 एप्रिल) दरवर्षी वनौषधी बिया, स्थानिक पारंपरिक जातीची बियाणे जमा करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येते. बेल, शेंद्री, जांभूळ, बकुळ, कडिपत्ता, रिठा, सीताअशोक, जारुळ, बहावा, पारिजातक, सोनचाफा अशा विविध सुमारे 40 प्रकारच्या वृक्षांचे बीज गोळा केले जाते. बीज गोळा करण्याबाबत शास्त्रीय माहिती संस्थेतर्फे देण्यात येते. यंदाच्या वर्षी सुमारे तीन लाख बिया गोळा झाल्या. या बिया विविध गटांमध्ये वाटून त्याची रोपे तयार करण्यात आली. उर्वरित बियाणे सामाजिक वनीकरण विभागाकडे संवर्धनासाठी दिले जाते. या उपक्रमातून स्थानिक जैवविविधता जोपासली जात आहे.

नैसर्गिक रंगाची निर्मिती
रंगपंचमीमध्ये नैसर्गिक रंग वापरले जावेत, यासाठी त्यांची निर्मिती आणि प्रबोधन संस्थेतर्फे केले जाते. संस्थेने पळस, काटेसावर, पांगिरा, बेल, पारिजातक, बहावा, मेहंदी, शेंद्री, हिरडा, बेहडा, झेंडू, गुलाब, खैर, नीलमोहर, जास्वंद अशा 23 झाडांचा अभ्यास केला. यांच्या फुलापासून नैसर्गिक रंगही तयार केले. निर्माल्यातून तसेच हार विकणाऱ्यांच्याकडून टाकाऊ फुलातूनही नैसर्गिक रंग तयार करण्यात आले आहेत. वनस्पतीजन्य रंग निर्मितीसाठी आदर्श बचत गटाच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.

सौरऊर्जेवर चूल
संस्थेचे सदस्य पराग केमकर यांनी सौरऊर्जेच्या चुलीचे विविध प्रकार तयार केले आहेत. गिफ्ट पेपर आणि पुठ्ठ्याच्या मदतीने ही सौर चूल करता येते. या सौर चुलीसाठी अन्न शिजविण्यासाठी दोन डबे लागतात. साधारणपणे पाचशे रुपयांत ही चूल तयार होऊ शकते. गिफ्ट पेपरऐवजी रेडियम पेपर व फायबरचा पुठ्ठाही वापरून टिकाऊ चूल तयार करता येऊ शकते. सौर चूल तयार करण्यासाठी साधनसामग्रीनुसार सुमारे 100 ते 1200 रुपये खर्च येतो. वर्षातील दोनशे दिवस ही चूल वापरून खाद्यपदार्थ शिजविता येतात. यामुळे सिलिंडरचा खर्च वाचतो, पर्यावरणाचे संरक्षण होते. ही चूल फ्लोडिंगची असल्याने कोठेही नेता येऊ शकते. प्रकाशवर्षाच्या निमित्ताने या चुलीचा प्रसार करण्याचे कार्य निसर्गमित्र संस्थेने हाती घेतले आहे. ही चूल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. आत्तापर्यंत सुमारे सातशे जणांनी ही सौर चूल तयार करून वापरही सुरू केला आहे.

संस्थेचे विविध उपक्रम ः
  •  दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नका? हा संदेश दिला जातो. तसेच या सुटीमध्ये फटाके न उडविणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते. फटाक्‍यांवर होणाऱ्या वायफळ खर्चातून ही सहल होते. 
  • जलप्रदूषण रोखण्यासाठी नैसर्गिक रंगाने रंगविलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून संस्था राबवीत आहे. 
  • "कचरा व्यवस्थापन' याविषयी जागृती करण्यासाठी शिवछत्रपती यांच्या कचराविषयीच्या आज्ञापत्राची आकर्षक पत्रके करून शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, तरुण मंडळे यांना देऊन प्रबोधन केले जात आहे. 
  • कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण. 
  • कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन. 

देवराया वाचवूया उपक्रम ः
संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील देवराया संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील 250 च्यावर देवरायांचा अभ्यास संस्थेने केला. या देवरायांची वैशिष्ट्ये जाणून घेतली. देवराईमध्ये असणाऱ्या जैवविविधतेची माहितीही स्थानिकांना दिली जाते. "देवराया वाचवूया, श्रद्धावने तयार करूया' या उपक्रमाअंतर्गत देवरायातील वृक्षांचे बी गोळा केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या रोपांची लागवड परिसरात केली जाते. भारतीय संस्कृतीतील विविध सणांसाठी लागणारे वड, आपटा, बेल, कडुलिंब आदी वृक्षांची लागवड केली जावी, यासाठी प्रबोधनाबरोबरच प्रयत्नही केले जातात.

वैशिष्ट्यपूर्ण देवराया ः
  • पाल देवराई ः भुदरगड तालुक्‍यातील पाल येथील देवराईमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. येथील वृक्षांचा विस्तार मोठा असल्याने परिसरात गारवा राहतो. या वृक्षांच्या डोलीत घुबड, वेडाराघू, ससाणे, दयाळ आदी पक्षांचे वास्तव्य आहे. 
  • आंबेश्‍वर देवराई ः शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा येथे पाच एकरांत ही देवराई आहे. येथे कासा, सोनचाफा, आंबा, पिंपर्णी, वड, किंजळ, बांबू, सातवीण, कदंब, कुंकुफळ असे विविध वृक्ष आहेत. ही देवराई वनौषधीने बहरलेली आहे. 
  • कुरकुंभेश्‍वर देवराई ः यात्रेमध्ये कोंबडे देण्याची प्रथा अनेक गावांत असते. पण आजरा तालुक्‍यातील पेरणोली येथील करकुंभेश्‍वर देवराईमध्ये मात्र जिवंत कोंबडे सोडण्याची प्रथा आहे. या देवराईमध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांना खाद्य म्हणून गावकरी कोंबडे सोडतात. वन्यप्राणी भक्षासाठी गावात प्रवेश करू नयेत, हा या मागचा हेतू आहे. 

शेवगा महोत्सव ः
शेवगा खाल्ल्याने क्षारधर्म वाढतो. यासाठी पावसाच्या सुरवातील शेवग्याची भाजी खावी असे शास्त्र आहे. याबाबत प्रबोधनासाठी दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात (मृग नक्षत्राच्या प्रारंभी) शेवगा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये शेवग्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. शेवग्याचे सूप, भजी, कढी, आमटी, वडी, थालीपीठ, झुणका, शेवगा फ्राय, चटणी, कटलेट, अशा विविध 63 प्रकारच्या पाककृती या महोत्सवात दाखविल्या जातात.


संपर्क ः 9423858711 अनिल चौगुले (कार्यवाह, निसर्ग मित्र)


Saturday, June 6, 2015

आनंद'दायी शेतीतून मिळतेय समाधान

शहरातील धकाधकीच्या जीवनात आनंदासाठी आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे सर्वांनाच वाटते. पर्यटन केंद्रावर जाण्यापेक्षा घरच्या शेतावरच जाऊन निसर्गाचा आनंद का घेऊ नये? या उद्देशाने कोल्हापूरातील डॉ. आनंद गुरव यांनी वडिलोपार्जित शेतीशी नाते जोडून घेतले. यामुळे दैनंदिन कामातून थकवा दूर होतो आणि काही प्रमाणात उत्पन्नही मिळते.

राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरातील रंकाळा रोडवर डॉ. आनंद गुरव यांचा दवाखाना आहे. डॉ. गुरव हे बालरोगतज्ज्ञ असून, 2005 मध्ये त्यांनी कोल्हापुरात दवाखान्यास सुरवात केली. गगनबावडा तालुक्‍यातील असंडोली हे डॉ. गुरव यांचे मूळगाव. वडिलोपार्जित शेतीतील चार एकर शेती डॉ. आनंद यांच्या वाट्याला आली. घरची शेती विकली तर गावाशी असलेली ओळखच नाहीशी होईल, या हेतूने त्यांनी स्वतःची शेती जोपासण्याचा निर्णय घेतला; पण वैद्यकीय व्यवसायातून वेळ कसा मिळणार, हाच मोठा प्रश्‍न होता. यासाठी त्यांनी शेती भागाने लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतीचे नियोजन सोपे गेले. त्याचबरोबरीने शेती विकासाच्या नवनवीन कल्पना राबविण्याची संधीही मिळाली. असंडोली परिसरातील जांभळी नदीच्या काठावर डॉ. आनंद यांची शेती आहे. निसर्गरम्य परिसर आणि कोदे येथील पाटबंधारे प्रकल्पामुळे पाण्याची मुबलकता या भागात आली आहे. यामुळे बागायती शेत विकण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. उलट विविध पीक पद्धतीचे नियोजन त्यांच्या डोक्‍यात येऊ लागले.
या परिसरातील स्वच्छ हवा, बाराही महिने हिरवागार निसर्ग सर्वांना खुणावत राहतो. शहरातील धकाधकीच्या जीवनात थोडीशी विश्रांती आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी अशा निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे डॉ. आनंद यांना मनोमन वाटते. यातूनच त्यांनी शेतीच्या नियोजनात लक्ष घातले. घरच्या चार एकरांच्या शेतीत डॉ. आनंद ऊस, उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल, मका, काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातून शेती व्यवस्थापनाचा मेळ घातला जातो.
कोल्हापूर शहरापासून 25 किलोमीटरवर असंडोली हे गाव आहे, त्यामुळे दररोज वैद्यकीय कामकाजातून शेतावर जाणे त्यांना शक्‍य होत नाही. त्यामुळे डॉ. गुरव यांनी वाटेकऱ्याच्या साथीने शेतीचे नियोजन केले आहे. दर आठ ते दहा दिवसांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वाटेकऱ्याबरोबरीने पीक व्यवस्थापनाचे नियोजन डॉ. गुरव करतात. गरजेनुसार पीक पद्धती ठरविली जाते. शेतीसाठी लागणारा निम्मा खर्च डॉ. आनंद करतात, निम्मा खर्च वाटेकरी करतो. येणाऱ्या उत्पन्न निम्मे- निम्मे वाटून घेतले जाते. त्यामुळे पीक उत्पादन वाढीवर सातत्य ठेवले जाते.

पीक व्यवस्थापनाचे नियोजन ः
- नदीकाठावर जमीन असल्याने ऊस हेच मुख्य पीक आहे. चार एकर शेतात तीन एकरांवर ऊस घेतला जातो. एका एकरात अन्य पिके घेतली जातात. पिकांच्या फेरपालटासाठी नियोजन डॉ. गुरव करतात.
- उसाची आडसाली लागवड असते. खोडवाही ठेवला जातो. त्यामुळे खर्चात काही प्रमाणात बचत होते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड होत होती. आता दोन वर्षांपासून रोप पद्धतीने ऊस लागवड केली जाते. परिसरातील साखर कारखान्यातून उसाच्या को-86032 जातीची रोपे खरेदी केली जातात. परिसरातील शेतकरी आणि ऊस तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये काही प्रमाणात मका, भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते.
- ऊस रोप लागवडीमुळे पिकाचा एक ते दीड महिन्याचा कालावधी वाचतो. लागवड कमी वेळेत पूर्ण होते. उसाची जोमदार वाढ होते. संख्याही योग्य राखली जाते. लागवडीस मजूरही कमी लागतात. सुमारे पाच हजार रुपये खर्चात बचत होते.
- सध्या उसाचे एकरी 35 टन उत्पादन मिळते. ऊस लागवड, रोपे, खत, पाणी आणि मजूर व्यवस्थापनासाठी त्यांना एकरी साधारणपणे 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो. वाटेकरी आणि सर्व खर्च वजा जाता एकरी 20 हजार रुपये मिळतात.
- दर दोन वर्षांनी माती परीक्षण करून त्यानुसार पीक निहाय सेंद्रिय आणि रासायनिक खतमात्रेचे नियोजन केले जाते.
- शेताच्या बांधावर देशी केळी तसेच आंब्याची कलमे लावली आहेत.
- दर वर्षी भाताची एक एकरावर लागवड असते. भाताच्या जया जातीची चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादनात सातत्य आहे. गगनबावडा परिसरात पाऊस अधिक पडत असल्याने येथे भाताची रोप लावणी केली जाते. पिकांच्या फेरपालटीमध्ये उन्हाळी भुईमूग लागवड केली जाते. त्यामुळे कुटंबास वर्षभर पुरेल इतके भात आणि भुईमुगाचे उत्पादन मिळते.
- वर्षभरात चार एकर शेतीतून सर्व खर्च वजा जाता सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नापेक्षा शेतीमध्ये आनंदाने जाणारा वेळ आणि नवनवीन पीक पद्धतीतून शेतीमध्ये होणारा बदल डॉ. गुरव यांना महत्त्वाचा वाटतो.

शेतीमधील प्रयोगांना चालना
शेती वाटेकरी करतो म्हणून केवळ उत्पन्न घ्यायलाच जायचे, हे डॉ. आनंद यांना पटत नाही. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासही प्रारंभ केला आहे. बांधावर फळबाग लागवड, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा शेतीत अवलंब, पाणी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्राबाबत डॉ. गुरव माहिती घेत असतात. या भागात विजेची अनियमितता आहे. त्यामुळे नदीमध्ये पाणी उपलब्ध असूनही पिकाला पाणी देताना अडचणी येतात. काही वेळा पिकाला गरजेच्या वेळी पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन डॉ. गुरव पाणीपुरवठ्याच्या पंपावर मोबाईल स्टार्टर बसविणार आहेत. मोबाईलवरून मिसकॉल दिला की मोटर सुरू होते आणि परत मिसकॉल दिला की मोटर बंद होते, त्यामुळे ज्यावेळी वीज असेल त्या वेळी लगेचच मोटार सुरू करणे शक्‍य होणार आहे.

संपर्क ः डॉ. आनंद गुरव ः 9822187049

Monday, June 1, 2015

जाणून घ्या सेंद्रिय शेतीच्या योजना

केंद्रातील मोदी सरकारही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. यापूर्वीच्या कॉंग्रेस सरकारनेही सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना तयार केल्या होता. गेल्या दहा वर्षात देशातील सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात वाढ होता आहे. कीडनाशके व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम पाहाता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन हे मिळायलाच हवे. आरोग्याच्या वाढत्या समस्या ह्या निकृष्ट अन्नामुळे आहेत. खाद्यपदार्थात कीडनाशकांचे प्रमाण पाहाता. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व विषमुक्त अन्नाची निर्मिती करायला हवी, ही आता काळाची गरज झाली आहे.
हे ओळखूनच सरकारने विशेष पाऊले उचलली आहेत. परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत 2015-16 आर्थिक वर्षासाठी केंद्राने सेंद्रिय शेतीसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये 50 शेतकऱ्यांचा एक गट करून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी निधी देण्यात येणार आहे. 50 शेतकरी प्रत्येकी एक एकरावर सेंद्रिय शेती करतील. या प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षांसाठी एकरी 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. 50 शेतकऱ्यांचे असे दहा हजार गट तयार केले जाणार आहेत. यामुळे तीन वर्षात पाच लाख एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली येणार आहे. या योजनेतून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल अशी आशा सरकारला वाटते. 2003-04 मध्ये देशात 42 हजार हेक्‍टरवर सेंद्रिय शेती केली जात होती. गेल्या दहा वर्षात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 17 पटीने वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये 7.23 लाख हेक्‍टरव वर सेंद्रिय शेती करण्यात आली आहे. 2001 पासून देशात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, नागालॅंड, मिझोरम, सिक्किम या राज्यात सेंद्रित शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंपरागत कृषि विकास योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक उद्यानविद्या विकास प्रकल्प, राष्ट्रीय तेलबिया आणि पामतेल प्रकल्प, आयसीएआरचा सेंद्रिय शेती नेटवर्क प्रकल्प या योजनेतून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. 

Sunday, May 24, 2015

ब्रॅंडनेम

कोल्हापूर शहरापासून 10 किलोमीटवरवर रामूचा गाव. पंचगंगा नदीच्याकाठी असल्याने बागायती शेतीने सधन. ऊस आणि भाजीपाला अमाप, पण गेल्या काही वर्षात शेतमालाला दर नसल्याने येथील शेतीचे चित्र पालटलेले होते. दहा वर्षापूर्वी गावच्या रस्त्यावर बघाल तिकडे गुऱ्हाळ होती. पण आता एखादेच गुऱ्हाळ सुरू आहे. रस्त्यावर वाहनांपेक्षा जनावरेच दिसायची. पण आता एखादे जनावरं जरी आडव आलं तरी वाहनांच्या रांगा लागतात. इतकी परिस्थिती बदलली आहे. विकास झाला, पण कुणाचा? हे सांगणेच आता कठीण आहे. कच्चे रस्ते होते. ते पक्के झाले. पाण्याची सुविधा नव्हती. आता तर बघेल तिकडे पाणीच पाणी आहे. हाफ चड्डीवर फिरणारा शेतकरी आता फुलपॅंडमध्ये दिसतो आहे. बाहेरगावचा पाहुणा कधी भेटला तर जेवल्याशिवाय गावातून सोडत नव्हते. पण आता स्मार्टफोनवर जेवलास काय हे विचारायलाही वेळ नाही. इतकी परिस्थिती बदलली आहे. शेतमालाला दर मिळत नसल्यापासून शेतकरी काही समाधानी दिसत नव्हता. गुळाला दर मिळत नाही. भाजीला दर नाही. यामुळे नुकसानात पडलेला शेतकरी गुऱ्हाळ बंद करून बसला आहे. शेतात पिकतयं म्हणून कुटुंब तरी खाऊन पिऊन सुखी आहेत. मुलांना शिकवायचे नोकरीत धाडायचं शेतात मात्र आणायचं नायं हाच विचार आता शेतकऱ्यांच्या डोक्‍यात घुमु लागलाय.
गावची पोरं आता पुण्या-मुंबईत शिकायला आहेत. तसे रामूचाही मुलगा पुण्याला शिकायला होता. त्याला भेटायला म्हणून रामू पुण्याला गेला. घरच्यांनी जाताना सांगितले, येताना बाकरवडी आणायला विसरू नका. चितळ्यांची बाकरवडी खूप प्रसिद्ध आहे. मुलाला भेटून घरी जाण्यासाठी रामू निघाला. जाताना बाकरवडी घ्यायचे हे त्याच्या डोक्‍यात पक्क होत. बाकरवडी खरेदीसाठी रामू चितळ्यांच्या दुकानात गेला. पाहतो तर काय? पावकिलो बाकरवडीसाठी भलीमोठी रांग. बाकरवडी प्रसिद्ध आहे. हे माहित होते, पण खरेदीसाठी इतकी मोठी रांग पाहून रामू हबकलाच. अर्धा तास रांगेत थांबून बाकरवडी रामूने खरेदी केली. रांगेत थांबून रामू थकला होता. रेशनला सुद्धा आजकाल इतकी गर्दी नसते. बाकरवडीसाठी येथे रांगा लागतात. याचेच आश्‍चर्य त्याला वाटत होते. बाकरवडी खरेदी करून रामू बाहेर आला. पाहतो तर काय? वडापाव खरेदीसाठीही गर्दी. येथे काही पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड लागते. हे पाहून रामुला खूप आश्‍चर्य वाटले. चहा प्यायचा, तर अमृततुल्य मध्येच. पण त्या चहाची चवच न्यारी असते. हे ही खरे. रामू कोल्हापूरला परतताना एसटीत हाच विचार त्याचा मनात घोळत होता. पदार्थाची प्रत चांगली असेल तर त्याला मागणी असते. लोक रांगाकरून तो पदार्थ खरेदी करतात. खरेदीसाठी चढाओढ असते. यातून त्या पदार्थाचे बॅंडनेम तयार होते. कोठेही जा? तशी प्रत, ती चव मिळतच नाही. मालाला मागणी हवी असेल तर प्रत उत्तम असावी लागते. प्रत उत्तम राखली, तर मालाला बाजारपेठही मिळते आणि प्रसिद्धीही मिळते. बेळगावचा कुंदा, नृसिंहवाडीचे कवठाची बर्फी, लोणावळ्याची चिक्की हे जसे प्रसिद्ध आहे. तसे आपण आपला गूळ का प्रसिद्ध करू नये. शेतमालासाठी असा दर्जा निर्माण केला तर....रामूच्या मनात वीज चमकली.
रामू घरी परतला. पण वेगळा विचार घेऊन आला. या विचाराने रामूचे जीवनच बदलले. बाजारात पत फक्त कर्ज घेण्यासाठी नको, तर मालाच्या प्रतीचीही पत हवी. माल फक्त नावावर जायला हवा. असे उत्तम प्रतीचे उत्पादन व्हायला हवे. मार्केटिंगचा हाच तर नियम आहे. चांगले उत्पादन असेल, तर ग्राहक किंमतीचाही विचार करत नाही. शेतमालही असाच तयार करायचा. गुळाची प्रतही अशीच ठेवायची. कोणीही विचारले गूळ कुणाचा? तर "रामूचा गूळ' असा सहज उच्चार व्हायला हवा. नावावर भाजी खरेदी व्हायला हवी. तशी प्रत आपण राखायला हवी. तसे उत्पादन करायला हवे.
विचारात आले ते कृतीत आणण्यात रामू पटाईत होता. रामूने यावर अभ्यास सुरू केला. गुळाची प्रत राखण्यासाठी त्याने सर्व तांत्रिकबाबी अभ्यासल्या. त्यानुसार त्याने योग्य ते बदल केले. सेंद्रिय गुळाचे उत्पादन तो घेऊ लागला. विषमुक्त अन्ननिर्मितीचा त्याने ध्यासच घेतला. रासायनिक खतांचा वापर बंद करून त्याने सेंद्रिय पद्धतीने उसाची लागवड सुरू केली. गुळामध्येही रसायनांचा वापर त्याने थांबवला. स्वतःचा गूळ उत्तम प्रतीचा, खराब होणार नाही याची हमी देणारा, पौष्टिकता जपणारा हा वेगळाच ब्रॅंड रामूने विकसित केला. यामध्ये विविध प्रकारही त्याने तयार केले. मोदकाचा आकार, गुळाच्या स्लेट असे विविध प्रकारही त्याने तयार केले. रामुच्या गुळाचा ब्रॅंड अल्पावधीत परिचित झाला. भाजीपालाही सेंद्रिय पद्धतीने करून त्यांने भाजीपाल्याचीही प्रत सुधारली. सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय गूळ आदी सेंद्रिय उत्पादने घेणारा शेतकरी म्हणून आता रामू परिचित झाला. वाशीच्या मार्केटमधून भाजीला मागणी होऊ लागली. अल्पावधीतच त्याच्या उत्पादनांना देशभरातून मागणी होऊ लागली. थेट विक्रीही होऊ लागल्याने रामूच्या नफ्यात भर पडली. त्याचा हा व्यवसाय पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी येऊ लागले. फक्त एका बॅंडने हे सर्व घडवले. उत्पादन असे घ्या, त्याचा ठसा उमटायला हवा. त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी. शेती उत्पादनातही आपण वेगळा बॅंड करू शकतो. हेच रामूने करून दाखवले. 

Sunday, May 17, 2015

कातळाला फुटला पाझर

कोकणातील खेड्यात राहणारा रामु आयएएस झाला. त्याचे स्वप्न आता सत्यात उतरले होते. गावच्या लोकांनाही त्याच्याबद्दल आदर होता. त्याचा सत्कार गावकऱ्यांनी केला. वाटलं होत तो आता गावचा विकास करेल पण आता ते शासकीय अधिकारी झाला होता. रामूला ग्राम विकासाने झपाटले होते. आता त्याचे ध्येय होते ग्रामीण विकास योजना राबविण्याचे. बिहारमधील एका भागात तो नोकरीत रुजू झाला. सुरवातीची एक-दोन वर्षे काम समजून घेण्यातच गेली. वरिष्ठ अधिकारी असल्याने रामूला अनेक अधिकार होते. पण अद्याप त्याने याचा वापर कधी केला नव्हता. आता त्याला त्याची गरज वाटू लागली. ग्राम विकासाच्या योजना सत्यात उतरविण्यासाठी तो नियोजन करू लागला. बिहारमधील गाव विकासाचे आराखडे त्याने तयार केले. शहराकडे येणारे लोंढे कमी व्हावेत या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. गावातील लोकांना गावातच रोजगाराच्या संधी देण्याच्या योजना त्याने आखल्या. त्याची अंमलबजावणी रामूने सुरू केली. रोजगारासाठी मधमाशापालन, कुकुटपालन आदी शेतीवर आधारित जोडधंद्यांना चालना देण्यास सुरवात झाली. शासनाच्या अनुदानाच्या योजना गावात राबविण्याचे प्रयत्न सुरू झाले. याची खबर गावच्या ठाकुरांना लागली. कामगारांअभावी त्यांचे उद्योग बंद पडण्याची भीती त्यांना वाटली. त्यांनी रामूला दम दिला. गावात याल तर याद राखा मुडदे पाडू अशी धमकीही दिली. सर्वगावातील ठाकुरांची एकी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर रोज मोर्चे येऊ लागले. रामू विरोधात वातावरण निर्माण झाले. पाटणा, दिल्लीपर्यंत रामूच्या तक्रारी गेल्या. प्रत्यक्षात रामूने कोणतीही कारवाई केली नव्हती तरी त्याच्या विरोधात रान उठले. दिल्लीतील नेत्यांनी रामूला बोलावून घेतले. रामूच्या योजनांची वरिष्ठापर्यंत माहिती होती. त्यांच्या कामाबद्दल ज्येष्ठ नेत्यांनाही आदर होता. धडाडीचा अधिकारी म्हणूनही त्याची ख्याती होती. विकासपुरूष म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जायचे. पण दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांकडे रामूच्या आलेल्या तक्रारींनी तेही चक्रावून गेले. राजकारणातील मुरब्बी नेते शेवटी त्यांनी रामुलाच खडसावले. सर्व राजकीय नेते एकाच माळेचे मणी. सरकार कोणाचेही असो खाद्य खाण्यासाठी ते एकत्रच जमतात. खाद्य मिळाले की त्यांचे विचार बदलतात. पांढऱ्याच काळे करण्याचा त्यांच्या तर हातखंडाच आहे. रामूच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. कामापेक्षा दिल्लीच्या सरकारी कागदपत्रांचीच उठाठेव वाढली. रामूने आवाज उठवला तर साथ देणारे कोणी नव्हते. शेवटी तो तेथे परका माणूस. ज्येष्ठ नेत्यांनीही रामूला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. पण रामूच तरुण रक्त ते मान्य करायला तयार नव्हते. तसे या प्रकरणाने रामू दिल्ली दरबारी चांगलाच परिचित झाला होता. माणूस चांगला, काम चांगले, विकासाचे स्वप्न पण साथ नसेल तर काय उपयोग? एका हाताने टाळी वाचत नाही. रामू या राजकीय पद्धतीला वैतागला. अखेर त्याने राजीनामा ठोकला आणि तडक कोकणातला गाव गाठला.

रामूने आता स्वतःच्या गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. रामू आता माजी अधिकारी असला तरी गावात त्याला मान होता. कोकणाला त्याचा चांगला परिचय होता. त्याच्यावर विश्‍वास होता. गावाने रामुला सरपंचपदी निवडले. बिनविरोध निवडून दिल्याने त्याला कामात उत्साह वाढला. पदाचा फायदा घेत त्याने गावाच्या विकासाच्या आराखडा तयार केला. कोकणात पाऊस जरी अधिक पडत असला तरी जानेवारीनंतर पाण्याची टंचाई भासतेच. मार्च ते मे महिन्यात याची तीव्रता वाढते. गावच्या विकासासातील हा सर्वांत मोठा अडसर होता. पाऊस असूनही नित्याची पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्याने विविध उपाय योजले. शासनाच्या योजनांचा फायदा घेत वनराई बंधारे, डोंगर उतारात पाणी अडवा पाणी जिरवा, छोटे छोटे बांध बांधून पाण्याचा साठा केला. या बांधबदिस्तीमुळे गावात असणाऱ्या आडाच्या पाण्यातही वाढ झाली. विहिरींना पाणी वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याची समस्या मिटली. पण आता आव्हान उभे राहिले ते पाणी पुरवठा योजनेचे. बाराही महिने पाणी पुरवठा करावा लागल्याने आता विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले. हे बिल भरणार कसे. याचा बोजा ग्रामपंचायतीवर पडला. साहजिकच याचा बोजा करावर पडला. ग्रामपंचायतीचे विविध कर वाढविणे भाग पडले. पाणी पट्टी वाढली. विकास केला तर हे तोटे वाढले. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सुर उमटू लागला. रामू या समस्येने वैतागला. विकास केला तर इतरही अनेक समस्या वाढतात हे त्याच्या लक्षातच आले नाही. विकासाने प्रगती व्हायला हवी अशा योजना राबविण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. गावच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी गावातीलच साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल याचा विचार तो करू लागला.

कोकणातील गावे ही डोंगर कपारीत आहेत. या डोंगर कपारीत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. उन्हाळ्यातही ते आटत नाहीत. गावात पाणी टंचाई भासू लागल्यावर याच स्रोतांतून पाणी आणले जायचे. गावापासून तीन चार किलोमीटर उंच भागात असणाऱ्या या स्रोतांचा अभ्यास रामूने केला. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत हे पाणी नेता आले तर गावाला बाराही महिने पाणी मिळेल उलट सायफनने पाणी पुरवठा झाल्याने विजेचे बिलही येणार नाही. महिलांना कूपनलिकेचे पाणी खेचावे लागणार नाही. दारात चौविस तास पाण्याचा पुरवठा होईल. अनेक समस्या मिटतील. हा विचार त्याने गावकऱ्यांनाही सांगितला गावानेही या योजनेला पाठिंबा दिला. पण डोंगरातील या स्रोतांतून पाणी आणण्यासाठी पाइपचा खर्च कोण करणार. इतका पैसा येणार कोठून? तो कसा उभा करायचा. पाणी पट्टी द्यायला ग्रामस्थ तयार नाहीत तेथे लाखाची योजना राबविण्यासाठी कसे पैसे येणार. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता होती. पण मुख्य प्रश्‍न होता तो पैशाचा? शेवटी शासनाकडे ग्रामसभेतून प्रस्ताव गेला. शासनाने एकात्मिक गाव विकास योजनेतून निधी मंजूर केला. यातून आवश्‍यक ते साहित्य खरेदी करण्यात आले. पण ते बसविण्यासाठी लागणारी मजूरी देण्यासाठी पैसा नव्हता. गावकऱ्यांची बैठक झाली. श्रमदानातून पाइप लाइन टाकायचे असे ठरले. गावातच पाइप लाइन करणारे कामगार होते. त्यांनी श्रमदानातून पाइप जोडून देण्याचे निश्‍चित केले. खड्डेही श्रमदानातून खोदण्यात आले. गावाच्या टाकीत अखेर पाणी पडले. उन्हाळा असो वा पावसाळा आता गावात बाराही महिने चोवीस तास पाणी मिळते. या पाण्याने गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. पाणी पट्टीही आकारली जात नाही. शून्य पाणी पट्टी आकारणार गाव म्हणून गावाचा राज्यभर लौकिकही झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच आता गावच्या जमिनीही बागायती झाल्या आहेत. कातळ पडीक जमीनीत आता हिरव्यागार झाल्या आहेत. बाराही महिने त्यावर पिके दिसत आहेत. गावात एसटी शिवाय वाहन येत नव्हते आता प्रत्येकाच्या दारात मोटार गाड्या दिसत आहेत. एका पाणी प्रश्‍नाच्या सोडवणूकीने इतका विकास झाला आहे. या विकासाची चर्चा आता देशभरात होत आहे. बिहारमध्येही याची चर्चा झाली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आता रामूच्या विकासाचे आराखडे पुन्हा मागवले आहेत. रामूला विकासाच्या योजना राबविण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याचे मार्गदर्शन आता तेथे घेतले जात आहे. दिल्लीवारीवर पाठविणारे ठाकूर आता रामूच्या विचारांनी गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिद्द असेल, ध्यास असेल तर कातळालाही पाझर फुटू शकतो. फक्त विचार विकासाचा हवा, ध्यास विकासाचा हवा. रामूनेही करून दाखवले आहे. शून्य पाणी पट्टी भरणारा मराठी गाव आता देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर नोंदविला गेला आहे.

Saturday, May 16, 2015

शेततळे

डोंगराच्या पायथ्याशीच रामूचे शेत होते. नदीपासून शेत दूर असल्याने फक्त कोरडवाहूच पिके होत. पावसाच्या पाण्यावर येणारे भात आणि हरभरा यावरच रामूचा चरितार्थ चालायचा. वाढत्या महागाईत इतक्‍या कमी उत्पन्नात घर कसे चालवायचे, हाच मोठा प्रश्‍न रामूला होता. पाच एकर डोंगर उतारात शेत असूनही मोठी अडचण होती. पाण्याची सोय झाली असती तर बागायती पिके घेऊन उत्पन्न वाढवता येणे शक्‍य होते. विहीर खोदून किंवा कूपनलिका मारून पाणी लागेलच याची शाश्‍वती नाही. कर्ज काढून विहीर खोदायची आणि पाणी लागलेच नाही तर काय? कर्जात बुडायचे. यामुळे रामू अस्वस्थ होता.
रामूने पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास घेतला. वारंवार तो पंचायतीमध्ये चकरा मारू लागला. पण फारसे यश त्याला येत नव्हते. काही पर्यायही सुचत नव्हते. विचारात डुंबलेला रामू चावडीवर हताश होऊन बसला होता. तेवढ्यात त्याचे समोर लावलेल्या जाहिरातीकडे लक्ष गेले. शेततळ्याच्या योजनेची जाहिरात होती. कृषी विभागाच्यावतीने ही योजना होती. विहिरी ऐवजी अनुदानावर शेततळे खोदले तर...रामूच्या डोक्‍यात प्रकाश पडला. शेततळे खोदण्याचे त्याने मनावर घेतले. शेततळ्याला फारशी जागाही लागत नाही. अर्ध्या एकरात शेततळे होऊ शकते. खर्चही फारसा नाही. ठराविक आकाराचा खड्डा खोदायचा. त्यावर प्लास्टिक शीट अंथरायचं. त्यात पाणी साठवायचे. पावसाळ्यात पाणी साठवायचे असल्याने पाणी लागले नाही. त्यामुळे श्रम वाया गेले ही भीतीही नाही. हिवाळ्यातले एक पीक जरी पाण्यावर आले तरी उत्पन्नात भर पडेल या उद्देशाने रामूने शेततळ्याचा निर्णय घेतला. डोंगराच्या पायथ्याशी शेत असल्याने रामूने वरच्या भागात तळे खोदायचा निर्णय घेतला. आश्‍चर्य म्हणजे तळाच्या दहा फुटावरच पाण्याचे झरे त्याला लागले. उन्हाळ्यात पाण्याचे उमाळे पाहून रामूलाही हायसे वाटले. पावसाळ्यात पाणी साठवायचीही गरज नाही. उन्हाळ्यात झरे फुटले होते. शेततळ्याच्या पाहणीसाठी येणारे अधिकारीही उमाळे लागलेले पाहून खूष झाले. त्यांनी प्लास्टिक शीटही न अंथरण्याचा सल्ला दिला. रामूचा तोही खर्च वाचला. अनुदानावरच त्याचे शेततळे झाले. पाण्याची सोयही झाली. पावसाळ्यात शेततळे भरले. भाता बरोबरच तो आता जनावरांच्या चाऱ्याची पिके घेऊ लागला. उसाचीही लागवड त्याने केली. बारमाही पिके शेतात डोलू लागल्याने उन्हाळ्यात ओसाड असणारा परिसर हिरवाईने फुलला होता. अनेक प्रकारची फळझाडेही आता बांधावर डोलू लागली होती. बारमाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. एका शेततळ्याने रामूला आर्थिक संपन्नता दिली होती.
पाण्याची सोय झाल्याने विविध प्रकारची पिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा खटाटोप रामूने सुरू केला. कृषी महाविद्यालयातील शेतकरी शास्त्रज्ञ मंच्यामध्येही तो सहभागी झाला. तेथे त्याला शेतीतील नवनवे तंत्रज्ञान समजू लागले.
एका एकरात 100 पिके ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेता येऊ शकतात. असे तंत्रज्ञान करणारे शेतकरीही त्याला शास्त्रज्ञ मंच्यात भेटले. घरात लागणारे सर्व धान्य शेतातच पिकवायचे. विकत काहीही आणायचे नाही. विषमुक्त अन्न निर्मिताचा हा विचार रामूलाही पटला. त्यानेही एका एकरात सेंद्रिय पद्धतीने 100 वर पिके घेण्याचा निर्णय घेतला. ही पिके कशी पिकवली जातात याचे तंत्र त्याने आत्मसात केले. यासाठी त्याने चार देशी गायीही पाळल्या. शेततळ्याच्या शेजारीच त्याने गोठा बांधला. शास्त्रोक्त पद्धतीने पिकांचे नियोजन केले. वाऱ्याची दिशा पाहून पिकांचे नियोजन केले. उंच पिके पश्‍चिमेकडे लहान उंचीची पिके पूर्वेकडे असे नियोजन त्याने केले. शेतात उत्तम सूर्यप्रकाश राहील अशा पद्धतीने त्याने आखणी केली. शेतातील विजेच्या खांबाशेजारीही वाया जाणाऱ्या जागेत त्याने पिके घेण्याचे नियोजन केले. विजेच्या खांबाभोवती उंच मातीचा ढिगारा रचून त्यावर कंदवर्गीय रताळी आदी पिके त्याने घेतली. भाजीपाल्याचेही नियोजन त्याने केले. एका एकरात भात, गहू, तूर, भाजीपाला, अशी जवळपास 100 वर पिके त्याने घेतली. घरात दररोज ताजा भाजीपालाही मिळू लागला. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्याने रासायनिक खतांचा खर्च वाचला. कीडनाशकासाठी फवारण्याही सेंद्रिय पद्धतीनेच होऊ लागल्याने विषमुक्त अन्न निर्मितीही होऊ लागली. घराच्या आरोग्या बरोबरच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांचेही आरोग्य जोपासले जात असल्याने त्याचेही पुण्य त्याचा पदरी पडले. विविध पिकांचा त्याचा अभ्यास झाला. बियाणे संवर्धनाचाही उपक्रम त्याने राबविला. देशी उत्तम प्रकारचे बियाणे त्याने साठविले. शेतात लागणारे सर्व बियाणे तो स्वतः उत्पादित करू लागला. यामुळे देशी बियाण्यांचे संवर्धनही त्याच्याकडून होऊ लागले. एका एकरात पाच माणसांचे कुटुंब चालवता येऊ शकते हा विचार त्याने प्रत्यक्षात करून दाखवला होता.
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा खटाटोप मात्र त्याचा सुरूच होता. शेतात असणाऱ्या शेततळ्यात त्याने मत्स्यसंवर्धन केले. पावसाळ्यात ऑगस्टमध्ये शेततळ्यात मासे सोडून एप्रिल मे मध्ये त्यांचे उत्पन्नही त्याला मिळू लागले. अवघ्या नऊ महिन्यात त्याला मत्स्यसंवर्धनातून काहीही न करता लाखोंची कमाई होऊ लागली. माशांना लागणारे खाद्यही शेतातच पिकत होते. त्याचाही खर्च नव्हता. केवळ उत्पन्नच उत्पन्न मिळू लागले. पाच वर्षात त्याने शेततळ्याच्या जोरावर केलेली भरभराट पाहण्यासाठी आता आसपासचे शेतकरीही येऊ लागले. राज्यभरात त्याच्या या प्रगतीची चर्चा सुरू होती. अवघ्या एका शेततळ्याने त्याला इतके संपन्न केले होते.