Monday, June 27, 2016

सावध रे सावध

सावध रे सावध
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ।।
आज संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरकडे रवाना होत आहेत. ग्यानबा तुकारामाच्या गजराने पुणे जिल्ह्याचा परिसर दुमदुमुन निघतो. अध्यात्माच्या प्रगतीसाठी निघालेले वारकरी एकमेकाला सावध करत पुढे चालत असतात. जा मार्गावरुन ही दिंडी निघते त्या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांनारेही या अध्यात्माच्या गजराने सावध होतात. पालखीचा हा सोहळा पाहून रस्त्याने जाणारा वाटसरूही त्याचे दुःख विसरतो. त्याच्यातील दुष्टभाव नाहीसा होऊन त्याच्या विचारात चांगुलपणाचा अंकुर फुटतो. इतके सामर्थ या पालखीच्या दर्शनाने होते. सर्वत्र प्रसन्नता, आनंद या वारी मार्गावर ओसंडून वाहात असतो. या प्रसन्नतेला येणारा-जाणारा वाटसरुही सावध होतो. त्याच्या मनालाही प्रसन्नता लाभते. नकळत त्याच्यातही बदल होतो. हा बदल त्याला जरी जाणवत नसला तरी त्याचे महत्त्व तो अनुभवत असतो. ही अनुभूती त्याला येत असते. फक्त त्याचे अवधान त्याने जागृत ठेवायला हवे. वारीची दृष्ये पाहणारेही या जयघोषाने प्रसन्न होऊन जातात. संतांच्या या आनंदाच्या डोहात आपणही डुंबायला हवे. वारीच्या या निमित्ताने आता आपणही सावध होऊ या. अध्यात्मात सावधानतेला महत्त्व आहे. युद्धाच्याक्षणी सैनिक एकमेकाला सावध करतात. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एकमेक सावध होत पुढे वाटचाल करतात. तसा आपणही सावध होत आपल्या शरीरातील अवयवांना सावध करत साधनेसाठी सज्ज व्हायला हवे. तन-मनास सावध करुन साधनेवर लक्ष केंद्रित करायला हवे. वारीतून तनाला आणि मनाला मिळणारी प्रसन्नता साठवून त्याचा वर्षभर उपयोग करायला हवा. पावसाळा चारच महिन्यांचा असतो. पण आता तर तो एक-दीड महिनाच पडतो. पावसाळ्यात पडणारे पाणी उन्हाळ्यात आपणास उपयोगी पडावे यासाठी आपण ते साठवून ठेवतो. धरणे, तलाव, पाणलोट विकास हा यासाठीच केला आहे. भूजलाच्या पातळीतही वाढ व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. भूगर्भाचे पुर्नभरण आपण करत आहोत. जणेकरुन उन्हाळ्यातही आपणस पाणी कमी पडू नये. तसे वारीचे हे दहा-बारा दिवस आनंद-प्रसन्नतेचा असतात. ही प्रसन्नता आपण साठवून ठेवायला हवी. याचा वापर वर्षभर करायला हवा. उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला हवी. ती आपल्या शरीरात साठवायला हवी. तनात मनात ती उर्जा कायम राहायला हवी. ही उर्जा साठवण्यासाठी आपण सावध व्हायला हवे. तनाला मनाला सावध करायला हवे. वर्षभर येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मनाला खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ मिळावे यासाठी ही उर्जा साठवायला हवी. यासाठीच वारीच्या प्रसन्न वातावरणात डुंबायला हवे. मन मोकळेपणाने त्यात सहभागी व्हायला हवे.

Saturday, June 4, 2016

अक्षर

तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित ।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ।। 32 ।। अध्याय 12 वा


सोऽहं हे अक्षर आहे तरी काय? सोऽहं हा स्वर आहे. आपण श्‍वास आत घेतो तेव्हा सो तर श्‍वास बाहेर सोडतो तेव्हा हम्‌ हा स्वर उत्पन्न होतो. श्‍वास आत बाहेर घेण्याची ही क्रिया म्हणजे सोऽहम्‌. साधनेत हेच तर करायचे असते. श्‍वास आत बाहेर घेण्याच्या या क्रियेवर मन केंद्रित करायचे असते. मन या स्वरात मिसळायचे असते. सोऽहं हे अक्षर असे आहे. आपला जन्म होतो तेव्हापासून ते आपला मृत्यू होईपर्यंत हाच तर जप सुरू असतो. समस्त जिवांचा हाच तर प्राण आहे. यासाठीच समस्त जिवात मी सामावलो आहे. मी म्हणजे हा सोऽहं सामावला आहे. प्रत्येक मानवामध्ये तो आहे. हा सोऽहं जो आत्मा आहे. तो या शरीरात आला आहे. जन्म झाल्यानंतर तो शरीरात येतो. मृत्यू पावल्यानंतर तो शरीरातून जातो. देहात आला असल्याने आपण त्याला नाव देतो. पण प्रत्येकाच्या देहात तो आहे. या देहात वेगळा, त्या देहात देहात वेगळा असा भेदभाव नाही. त्याला मरण नाही. तो अमर आहे. अविनाशी आहे. इंद्रियात येतो पण इंद्रियापासून तो वेगळा आहे. सोऽहं हा स्वर आहे त्यामुळे तो दिसत नाही. पण तो कानाने ऐकायचा असतो. मन त्याच्यावर नियंत्रित करायचे असते. डोळ्यांची नजर त्याच्यावर केंद्रित करायची असते. त्याला वास नाही, गंध नाही त्यामुळे त्याची जाणीव ही स्वरांनीच अनुभवायची असते. आपण म्हणजे कोण आहोत ? आपणाला नाव आहे पण ते आपण नाही. ते देहाचे नाव आहे. मग आपले खरे स्वरूप काय आहे? श्‍वास हेच आपले खरे स्वरूप आहे. आपण म्हणजे श्‍वास आहोत. श्‍वासातील स्वर सोऽहं. हे आपले खरे स्वरूप आहे. हे आपण ओळखायला हवे. ते जाणून घ्यायला हवे. ते अनुभवायला हवे. त्याची अनुभूती यायला हवी. अनुभवातूनच अध्यात्माची खरी ओळख होते. यासाठी हा स्वर अनुभवायला हवा. आपण म्हणजे सोऽहं. ही वस्तू आहोत हे जाणून घ्यायला हवे. ज्याला हे समजले तो ज्ञानी. ज्याने याचा अनुभव घेतला तो ज्ञानस्वरुप होतो. ज्याला याचा बोध होतो तो आत्मज्ञानी होतो. अमरत्वाला पोहोचतो. कारण सोऽहं हे अक्षर अमर आहे. अविनाशी आहे. यासाठी या भावनेने सोऽहं ची साधना करायला हवी. उपासना करायला हवी. म्हणजे आपणही आत्मज्ञानी होऊ. आपणही त्याचा बोध घ्यायला शिकले पाहिजे. हेच अध्यात्म आहे. अध्यात्म हे याच अक्षरात सामावले आहे. या अक्षरातच सर्व विश्‍व सामावले आहे. यामुळेच या विश्‍वस्वरुप अक्षराची उपासना करायला हवी. सर्व सचिवांची अनुभूती या अक्षरातून घ्यायला हवी. 

Saturday, May 7, 2016

वडिलोपार्जित वसा जपण्याचा हसूरच्या डॉक्‍टरांचा ध्यास



वडिलोपार्जित शेती टिकवून ठेवायची, विकायची नाही, याच उद्देशाने गेली २४ वर्षे डॉ. सचिन कुलकर्णी (हसूरकर) शेती करीत आहेत. हसूर (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे त्यांची शेती आहे. कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसाय सांभाळत गावाकडची शेतीही ते पाहतात. पीक उत्पादनवाढीचे प्रयोग करीत डॉ. सचिन कुलकर्णी यांची शेतीमधील वाटचाल सुरू आहे. 

राजेंद्र घोरपडे 

कोल्हापूर शहरातील डॉ. सचिन विनायक कुलकर्णी (हसूरकर) हे व्यवसायाने त्वचारोगतज्ज्ञ. करवीर तालुक्‍यातील हसूर हे त्यांचे मूळ गाव. हसूर आणि बाटणवाडी परिसरात त्यांची वीस एकर बागायती आणि चार एकर डोंगराळ शेती आहे. बाकीची शेती जिरायती आहे. वडिलोपार्जित शेती असल्याने लहानपणापासूनच डॉक्‍टरांना पीक पद्धतीची माहिती होती. डॉक्‍टरांचे आजोबा काशिनाथ हरी कुलकर्णी हे भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. या भागातल्या शेतकऱ्यांना आजोबा मार्गदर्शन करत. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे डॉ. सचिन यांना शेतीची आवड निर्माण झाली. आजोबा त्याकाळी चांगल्या पद्धतीने गुऱ्हाळही चालवत. परंतु कारखाना सुरू झाल्यानंतर गुऱ्हाळ बंद झाले. आजोबांच्या इच्छेपोटी डॉ. सचिन यांचे वडील डॉ. विनायक हेसुद्धा डॉक्‍टरी व्यवसाय सांभाळत शेती पाहत होते. त्यांचाच वारसा आता गेली २४ वर्षे डॉ. सचिन चालवत आहेत.
शेती नियोजनाबाबत डॉ. कुलकर्णी म्हणाले की, वीस एकर बागायत शेती ही पाच ठिकाणी विभागलेली आहे. विविध ठिकाणची शेती पाहणे शक्‍य होत नाही. त्यामुळे शेताचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यासाठी मी वाटेकरी नेमले आहेत. वाटेकऱ्यांच्यामुळे शेती टिकून चांगले उत्पादनही मिळत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाबरोबरच आठ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधानही मिळते. शेतात उत्पादित होणारा चारा वाटेकरी त्यांच्या जनावरांसाठी वापरतात. काही वाटेकरी उसात चाऱ्यासाठी मक्‍याची लागवड करतात. या बदल्यात या वाटेकऱ्यांकडून शेतीस लागणारे शेणखत मिळते. वैद्यकीय व्यवसायामुळे आठवड्यातून दोन दिवस शेतीच्या नियोजनासाठी वेळ मिळतो. त्या वेळी शेतीमधील अडचणी आणि उपायांबाबत वाटेकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा होते.
डॉ. कुलकर्णी यांनी प्रयोग परिवाराचे डॉ. श्रीधर दाभोळकर यांच्या मार्गदर्शनानुसार गांडूळ शेतीचा प्रयोग केला होता. शेतामध्येच गांडूळखत तयार केले. ठराविक आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये शेणखत आणि ऊस पाचट कुजवून त्यामध्ये गांडुळे सोडली. खत तयार झाल्यावर हे खत शेतामध्ये मिसळून भुईमुगाचे चांगले उत्पादन घेतले. जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर ते करतात. प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला त्यांना शेतीच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरतो. डॉ. कुलकर्णी यांची काही शेती काळवट, पाणथळ आहे. जमिनीत पाणी साचून राहत असल्याने पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. हे विचारात घेऊन त्यांनी या क्षेत्रामध्ये मुरमाड माती मिसळली. जमिनीचे सपाटीकरण केले. त्याचा पुढे पीक उत्पादनासाठी फायदा होणार आहे.

रोप पद्धतीने ऊस लागवड ः 


डॉ. कुलकर्णी यांच्या शेतामध्ये मुख्यतः ऊस, भात, भुईमूग पिकांची हंगामनिहाय लागवड असते. पूर्वी ते उसाची पारंपरिक पद्धतीने लागवड करीत होते. पण बऱ्याचदा पिकाची व्यवस्थित वाढ होत नव्हती. यावर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने रोप पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. चार फुटाची सरी ठेवून को- ८६०३२ आणि को-९२०५ या जातीच्या रोपांची लागवड सुरू केली. कांड्याने लागवड केलेल्या उसाचे एकरी उत्पादन ३० ते ३५ टनांपर्यंतच येत होते. आता रोप लागवडीमुळे ५० टनांपर्यंत पोचले आहे. खोडव्याचे उत्पादन ३५ टनांपर्यंत मिळते. रोप लागवडीमुळे दोन महिन्यांचा कालवधी आणि खर्चही वाचला. रोपांमध्ये मर कमी असल्याने वाढ चांगली होते. आलेल्या उत्पन्नातील जमिनीसाठीचा चौथाई हिस्सा डॉक्‍टर घेतात. उरलेले ७५ टक्के उत्पन्न निम्मे-निम्मे विभागून घेतले जाते. मशागतीपासून कापणीपर्यंतचा सर्व खर्च डॉक्‍टर स्वतः करतात. सर्व खर्च वजा जाता आणि वाटेकऱ्यांचा हिस्सा वजा जाता उसातून एकरी २० हजार रुपये मिळतात. ऊस काढल्यानंतर त्या शेतात भात लागवड केली जाते किंवा रान पड ठेवले जाते. भात पिकासाठी लागणारा सर्व खर्च डॉक्‍टर करतात. भाताच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकरी ३० क्विंटल भात उत्पादन त्यांना मिळते. त्यातील निम्मे-निम्मे उत्पादन वाटून घेतले जाते. येत्या काळात पाणीटंचाई लक्षात घेऊन सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे त्यांचे नियोजन आहे.

बांधही देतो उत्पन्न 

डॉक्‍टरांनी शेतीच्या बांधावर शेवगा, आंबा, नारळाची लागवड केली आहे. यातूनही त्यांना उत्पन्न मिळते. डॉक्‍टरांच्या आजोबांनी लावलेल्या हापूस, पायरी आंब्याचे उत्पादन आजही त्यांना मिळते. फळझाडांची योग्य निगा राखली, तर उत्पादन नियमित मिळते, हा डॉक्‍टरांचा अनुभव आहे. झाडांना आळे करून खते, पाणी नियमित देत असल्याने आजही ही फळझाडे चांगले उत्पादन देतात.

अवजारे, ट्रॅक्‍टरची खरेदी 

बागायती शेती असल्याने वारंवार शेती अवजारे आणि ट्रॅक्‍टरची गरज भासते. शेती मशागतीची कामे वेळेवर झाली नाहीत, तर उत्पादनावर परिणाम होतो. मशागतीसाठी वेळेवर ट्रॅक्‍टर, अवजारेही मिळत नाहीत. वारंवार भेडसावणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्‍टरांनी ट्रॅक्‍टर आणि शेती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या अवजारांची खरेदी केली. त्यामुळे शेती नियोजनाचे काम सोपे झाले. वेळेची बचत झाली.

रुग्ण देतात पीक व्यवस्थापनाच्या टिप्स 

डॉ. सचिन कुलकर्णी हसूर गावातही प्रॅक्‍टिस करतात. त्या वेळी अनेक रुग्ण त्यांच्या पीक व्यवस्थापनाची चौकशी करतात. रुग्णांसोबत डॉक्‍टरही स्वतःच्या शेतीतील प्रश्‍नांवर चर्चा करतात. उसामध्ये हुमणी आणि लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता, तेव्हा डॉक्‍टरांनी औषधोपचारासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडूनच उपाययोजना जाणून घेतल्या. त्यानुसार नियोजन केल्याने पिकाचे नुकसान कमी झाले. वेळोवेळी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला पीक व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरतो आहे.

संपर्क ः डॉ. सचिन कुलकर्णी (हसूरकर) ः ९८२२६८१०२६ 

Saturday, December 12, 2015

चला पंचगंगा वाचवुया....


आज सकाळी पंचगंगा नदीवर सकाळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. एकदिवसाच्या या उपक्रमाने पंचगंगेचा घाट स्वच्छ झाला. याबाबत आता जनमानसात जागृतीची गरज आहे. राजकर्त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देण्याची गरज आहे. यासाठी या निमित्ताने.....

भारतीय जनता पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी नद्यांचे प्रदुषण रोखण्याचे आश्‍वासन दिले होते. गंगा नदीची स्वच्छता सुरु झाली असेल पण देशातील इतर नद्यांचे काय? इतर नद्यांच्या प्रदुषणाबाबत सरकार कोणती भूमिका घेणार याबाबत अद्याप कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. नद्यांच्या प्रदुषणात वाढच होत आहे. निवडणूकांपूर्वी आश्‍वासने द्यायची निवडणुका झाल्या की प्रश्‍नांकडे डोळे झाक करायची हा सर्वच पक्षांचा अजेंडा आहे. त्यात नवे काही नाही. कॉंग्रेस असो वा भाजप वा जनता दल हे सर्वच पक्ष आत्तापर्यंत हेच करत आले आहेत. सत्तेच्या राजकारणात हे पर्यावरणाचे प्रश्‍न मात्र गंभीर होत आहेत. देशातील जंगल नष्ट होत आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनाचा प्रश्‍न गंभीर होताना दिसत आहे. जंगलाचे क्षेत्र घटू लागल्याने वन्य प्राणी नागरी वस्त्यात आलेले पाहायला मिळत आहे. यात त्यांचा बळी जातोय. याबरोबरच शेतकऱ्यांचेही यामध्ये नुकसान होत आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे सरकारने गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. विदेशात जाऊन पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारायच्या. चर्चा करायच्या, देशाचे नाव उंचावेल असे भाषण ठोकायचे. पण देशात येऊन काहीच करायचे नाही. हेच आत्तापर्यंत सर्वच पक्षाच्या राजकर्त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हेच करतील असे वाटत नसले तरी त्यांनी तसे करू नये यासाठी आपणच आता जागरुक होण्याची वेळ आली आहे. पत्रकारांनी जागल्याची भूमिका नेहमीच बजावायला हवी. राजकर्त्यांनी आश्‍वासने पाळावीत यासाठी पहारा देण्याचे काम करायलाच हवे. हे समाजकार्य वृत्तपत्रांनी करायला हवे. सौर उर्जेवर आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्याचा पंतप्रधानांचा विचार उत्तम आहे. पण याबरोबरच देशात दिलेली आश्‍वासनेही पाळणे गरजेचे आहे. राजकर्त्यांच्या आश्‍वासनांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे राजकारण बाजूला ठेऊन पाहायला हवे. यासाठी सामाजिक संघटनांना बळकटी देण्याची गरज आहे. तरच देशातील नद्यांच्या प्रश्‍न मार्गी लागू शकेल. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक नदीचा आराखडा तयार होण्याची गरज आहे. आता असे आराखडे शासकिय पातळीवर झालेही असतील पण त्याला लोक सहभागाने राबविण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवीत. तरच देशातील नद्यात शुद्ध पाणी पाहायला मिळेल. अन्यथा वाढत्या लोकसंख्येने या प्रदुषणात भर होऊन मोठी गटारगंगा होण्यात वेळ लागणार नाही. लोकसहभागाने व राजकारण बाजूला ठेऊनच हे कार्य केल्यास देशातील सर्वच गंगा शुद्ध होतील. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष विचारात घेता त्याच्या शुद्धतेसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. धरणातील पाणी साठेही अशुद्ध होऊ शकतात. ठराविक वर्षांच्या कालावधीनंतर हे साठे वापरण्यायोग्य राहात नाहीत. यासाठी अशा साठ्यांच्या पुढील काळातील प्रश्‍नावरही विचार होण्याची गरज आहे. दुरदृष्टी ठेऊन विचार होण्याची गरज आहे. नेमके हेच होताना दिसत नाही. म्हणून पर्यावरणाच्या प्रश्‍नांचे आता राजकारण थांबवायला हवे. या प्रश्‍नाने आरोग्याचे प्रश्‍नही उभे राहात आहेत. यासाठी आता वेळीच तोडगा निघायला हवा. 

Friday, December 11, 2015

शेतकऱ्यांची नाडी जाणणारा राजा

माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त.....

माननिय शरद पवार यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान नेहरुंच्याही विचारांचा मोठा पगडा आहे. जवाहरलाल नेहरु यांनी म्हटले होते की सर्व काही थांबेल पण शेती कधीच थांबू शकत नाही. हेच त्यांचे विचार पवार यांना प्रभावित करत राहीले. त्यांनी शेतीवर अधिक भर दिला. त्यांच्या आचारात, विचारात एक शेतकरी दडला आहे. राजकारणामध्ये ते बोलतात एक आणि करतात एक असे जरी त्यांच्या विषयी म्हटले जात असले तरी शेतीमध्ये पवारसाहेब हे नेहमी जे बोलतात तेच करून दाखवतात. 
एकदा ते बोलता बोलता म्हणाले होते की लहानपणी ते स्वतः दौंडला जाऊन फळे, भाजी विकायचे. फळे, भाजीची विक्री करताना शेतकऱ्याला काय यातना होतात त्या त्यानी स्वतः अनुभवल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळतो का? हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. ठेच लागल्यानंतरच शहाणपण येते. पवारसाहेबांनी त्यांच्या लहानवयातच हे कष्ट सोसले. त्यांना शेतकऱ्यांची दुःखे माहीत आहेत. त्यांच्या कृतीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कळवळा दिसून येतो. या अनुभवातूनच शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी जाणणारा माणूसच शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकतो. तशी योजना तयार करतो. विकास कसा साधायचा हे त्यालाच समजते. 
पवार यांच्या बारामतीमध्ये केवळ आठ इंचच पाऊस पडतो. जवळपास 70 टक्‍क्‍याहून अधिक जमीन ही कोरडवाहू आहे. दुष्काळी पट्ट्यात मोडते. असे असूनही या जिल्ह्यात बारा साखर कारखाने उभे आहेत. येथे पिकणारी द्राक्षे परदेशात पाठवली जातात. फळांच्या ज्यूसचे आंतरराष्ट्रीय बॅंड येथेच उत्पादीत केले जातात. अशा अनेक विकासाचे प्रकल्प याच पट्ट्यात आहेत. हे केवळ पवार यांच्यामुळेच शक्‍य झाले आहे. बारामतीच्या विकासाचा हा पॅटर्न देशभर गाजतोय. अनेकांना प्रेरणा देतोय. 
राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पवार यांनी 90 च्या दशकात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची योजना आणली. फळझाडांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान जाहीर केले. कोरडवाहू पट्ट्यात यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. या योजनेचा लाभ घेत अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या. उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. फळे विकली गेली नाहीत तर तो शेतकरी स्वतः फळे खाऊन जगू शकतो. उपाशी राहणार नाही. कुपोषण तरी थांबेल. या योजनेमागे हा दृष्टीकोन शरद पवार यांचा असावा. त्यांच्या या योजनेमुळे अनेक पडीक जमीनी लागवडीखाली आल्या. ओसाड माळरानावर डाळींबे, अंजीराच्या बागा फुलल्या. कोकणात आंबा, काजूच्या बागा फुलल्या. फळांचे उत्पादन तर वाढलेच. याशिवाय ग्रामीण भागात फळावर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योगही उदयास आले. अल्पभूधारक शेतकरी बागायतदार झाला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती माहीत असल्यानेच त्यांनी ही योजना आखली. शेतकरी काम करू इच्छितो. उत्पादन घेण्याचीही त्याची तयारी आहे. कष्ट करण्यासाठी तो मागेपुढे पाहात नाही. पण त्याच्याजवळ भांडवल नाही. फळबागा फुलवायच्या आहेत पण त्याच्या हातात पैसा नाही. शेतकऱ्यांची ही आर्थिक नाडी पवारसाहेबांनी ओळखली होती. भांडवल नसेल तर धंदा कसा उभा राहणार. पैसा नसेल तर शेतकरी काय करणार? शेतात तो बी पेरतो पण त्याला खत-पाणी देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही. असा हा शेतकरी जमीनीत फळबागा कशा फुलविणार? हे शेतकऱ्यांचे दुःख शरद पवार यांनी ओळखले. त्याला भांडवल उपलब्ध करून दिले तर तो निश्‍चितच प्रयत्न करेल. यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार यांनी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फळबागा फुलविण्याची संधी दिली. पवारांच्या या योजनेने राज्यभरात पडीक रानावर फळबागा फुलल्या. झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरण सुधारा असा प्रचारही येथे करण्याची वेळ आली नाही. पवार साहेबांची ही योजना पर्यावरणालाही साथ देणारी ठरली. या योजनेच्या सुरवातीनंतर अवघ्या सात-आठ वर्षात राज्यातील फळांचे उत्पादन झपाट्याने वाढले. कोकणातील व्यक्तींना ही योजना फारच लाभदायक ठरली. 
शरद पवार यांचे वैशिष्ठ म्हणजे ते योजना आणताना विकास डोळ्यासमोर ठेवतात. राजकारण बाजूला ठेवतात. योजनेतून राजकीय लाभ काय मिळेल हे पाहात नाहीत. त्यांच्या विकासाच्या प्रत्येक योजनेच्या कृतीत हा दृष्टीकोन पाहायला मिळतो. 
सध्याच्या राजकारण्यांचे दृष्टीकोन वेगळेच असतात. प्रथम ते स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि मग इतरांचा विचार करतात. अशा या त्यांच्या वृत्तीमुळेच ते राजकारणात मागे पडत आहेत. दुरदृष्टीचा अभाव त्यांच्याकडे आहे. राजकारणी व्यक्ती आणि पुस्तके वाचण हे गणित तर आता दूरच राहीले आहे. नव्या पिढीतील किती राजकारणी पुस्तके वाचतात सांगा ना? पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना तरी ते हजर राहतात का? हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पुस्तके वाचत नाहीत तेथे लिखाण तर कोठे करणार? सध्याच्या तरूण राजकर्त्यांनी शरद पवार यांचा पुस्तक वाचनाचा छंद जरी जोपासला तरी ते राजकारणात तग धरून राहतील. अन्यथा पाच वर्षांचा कालावधीही ते पूर्ण करू शकतील का? याबाबत शंका वाटते. शरद पवार यांचा प्रत्येक गोष्टीचा गाढा अभ्यास आहे. यासाठी ते सतत विविध विषयांची पुस्तके वाचतात. जुन्या पिढीतील राजकर्त्ये व चळवळीचे राजकर्त्ये सोडले तर पुस्तक वाचन हा विषयच सध्याच्या तरूण राज्यकर्त्यांना माहीत नाही. चळवळीच्या व्याख्यांनाना आता वेगळेच स्वरूप त्यामुळे प्राप्त झाले आहे. अभ्यास नसल्याने बेताल वक्तव्ये केली जात आहेत. विकास हा विचारच त्यांच्या डोक्‍यात येत नाही. त्यांना केवळ स्वतःचाच विचार डोक्‍यात येतो. रस्त्याची योजना आहे ना? इतका निधी त्यासाठी मंजूर झाला आहे. ठिक आहे. निवडणुका सहा महिन्यात आहेत. सहा महिने टिकतीय अशा पद्धतीचे रस्त्ये तयार झाले तरी त्यांना चालते. सहा महिन्यानंतर निवडणूका जिंकल्यावर रस्तावरील खड्डे हे पुढच्या निवडणूकीच्या आधी सहा महिने बुजविले जातात. तोपर्यंत त्या रस्त्यांचे काहीही होऊ या राजकर्त्यांचा संबंधच नसतो. अशी विचारसरणी सध्याच्या नव्या पिढीतील राज्यकर्त्यांची आहे. योजनाही ते अशाच पद्धतीने राबवितात. नव्या योजनाही आखताना ते असाच विचार करतात. अशा या कृतीने विकास ठप्प झाला आहे. 
शरद पवार यांचे आदर्श या नव्या राजकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन कार्य करायला हवे. जनचेचे दुःख जाणून घेऊन योजना आखायला हव्यात. जनतेच्या मतांची नाडी तपासून विकास होत नाही. जनतेच्या दुःखाची नाडी ओळखता यायला हवी. ही नाडी सापडली तरच त्यांच्या दुःखावर औषध देता येईल. पवारसाहेबांनी नाडी कशी तपासली हे त्यांच्याकडून जाणून घ्यायला हवे. शेतकऱ्यांची नाडी त्यांनी ओळखली म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकले. त्यांच्या योजनांनी शेतकऱ्यांचा मोठा विकास झाला आहे. त्यांच्या कार्यकालात धान्य उत्पादन कित्येक पटींनी वाढले. धान्य साठविण्यासाठी गोदामे कमी पडली इतके धान्य उत्पादन झाले. शेतकरी समृद्ध झाला. देश समृद्ध झाला. धान्य उत्पादनाचे उच्चांक त्यांच्या कार्यकालात घडले आहेत. विकास हा असा करायचा असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ या समस्यांनी ते डगमगले नाहीत. यासाठी त्यांनी विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे दुःख पुसण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ दौरा करताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीचीही काळजी कधी केली नाही. दुष्काळसाठी विशेष पॅकेज केंद्राकडून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील राहीले. जगात सर्व उद्योग बंद पडू शकतात पण कृषी हा असा उद्योग आहे जो कधीही बंद पडू शकत नाही. हा उद्योग संपला तर या जगात माणूस जगूच शकणार नाही. यासाठी शेतीचा विकास हेच ध्येय पवारसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेण्याची वक्तव्ये केली तरी शेतीतून निवृत्ती घेण्याचे वक्तव्य ते कधीही करणार नाहीत याची मला खात्री आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 
157, साळोखेनगर, कोल्हापूर 416007 र्ल ः 9011087406

Tuesday, December 1, 2015

कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

कारदगा हे कर्नाटकतील चिक्कोडी तालुक्यातील गाव. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या या गावात मराठी भाषीकांची संख्या अधिक आहे. कर्नाटकात गेलो म्हणून काय झाले आम्हाला आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. कोठेही जाऊ कोठेही राहू पण मराठी आमची मायबोली आम्ही कायम ठेऊ हा निर्धार या गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच या गावात गेली वीस वर्षे न चुकता साहित्य संमेलन होत आहे. यंदाही हे संमेलन झाले. या संमेलनास 89 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. मराठीचा या गावात होणारा गजर पाहून ते भारावून गेले. ग्रामीण भागात मराठी विषयी असणारी आपुलकी आपलेपणा, मराठीचा हा बाणा पाहून मराठी किती समृद्ध आहे याचीच प्रचिती येथे येते. जात, पंथ, धर्म बाजुला ठेऊन सर्वचजण या व्यासपीठावर एकत्र येतात. मराठी भाषेबद्दल असणारे हे त्यांचे प्रेम पाहून कोणीही भारावून जाईल असेच येथील वातावरण असते. 
वारकरी संप्रदायाने मराठीची पताका उंच फडकावली. मग या संमेलनात वारकऱ्यांची आठवण होणार नाही असे घडणारच नाही. सकाळी काढलेल्या ग्रंथ दिंडीत वारकरी वेशात बालगोपालांचा सहभाग, तालात, सुरात त्यांनी केलेला मराठीचा गजर, भजन, कीर्तन मराठीची खरी ओळख करुन दिल्याशिवाय राहात नाही. नऊवारीत- सहावारीत नटलेल्या मुलींमधून मराठी संस्कृती विषयी असणारी आपली आपुलकी, मराठी विचाराशी असणारे आपले प्रेम ओसंडून वाहताना दिसत होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात महिलांच्या उत्स्पुर्त प्रतिसादात निघालेली ग्रंथदिडी सीमाभागात मराठीचा हा ताठर बाणा कायम राखेल असाचा विश्वास दाखवत होती. संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या दिंडीचे कौतुक करताना श्री. सबनीस म्हणाले बळीचे राज्य, बहुजन श्रमिकांचे राज्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम या दिंडीत पाहायला मिळाला. पण त्याचबरोबरच दुष्काळाची जाणीव करुन देणारे वास्तवाचे भानही पाहायला मिळाले. यावरून या गावाची वैचारिक, सामाजिक समृद्धता लक्षात येते. येथील ग्रामीण साहित्यात विठ्ठल आणि भक्ती केंद्रस्थानी आहे. धुमान साहित्य संमलेनाने संत नामदेवांना राष्ट्रीय पातळीवर नेले तर कारदगा संमेलनाने धर्मनिरपेक्षतेचे सूत्र बांधले.
सीमाभागात मराठीच्या गौरवाचा आदर्श इतर गावांनीही व महाराष्ट्राने घ्यायला हवा. मराठीच्या समृद्धीसाठी, मराठी संस्कृती जोपासण्यासाठी मराठी विषयीचे आपले प्रेम, आपुलकी कायम ठेवण्यासाठी अशा साहित्याच्या गावांना भेट द्यायला हवी. नेहमी यावे नेहमी नांदावे असे हे गाव मराठीचा एक वेगळा बाणा कायम ठेवत आहे याबद्दल संमेलन आयोजकांचे मनापासून आभार मानावेत असे वाटते.
श्री सबनीस सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माझा कृषि ज्ञानेश्वरी या पुस्तकाचा गौरव केला शेणाला सोन्याचा भाव आला आहे इतके शेणाचे महत्त्व आहे जमीन उत्तम तर शेतकरी उत्तम हे ओळखून सेद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही त्यांनी केले ज्ञानेश्वरीतील शेती विषयक ओव्यावर आधारित या पुस्तकाचा गौरव केला याबद्दल सबनीससरांचे आभार मानायलाच हवेत
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
श्री अथर्व प्रकाशन, साळोखेनगर, कोल्हापूर

Saturday, November 28, 2015

फळझाडांनी माळरान झाले हिरवेगार

डॉ. प्रभू यांनी पंधरा एकरांवर फुलवली वनराई 

निसर्ग आणि शेतीच्या प्रेमापोटी कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी स्वकमाईतून करनूर (जि. कोल्हापूर) गावामध्ये शेती खरेदी केली. या जागेत वनस्पतींची जैवविविधता जोपासण्यासाठी डॉ. प्रभू यांनी पंधरा एकरांत वनराई उभारली. या ठिकाणी विविध फळझाडांची लागवड तसेच वनीकरण केल्याने परिसर हिरवागार झाला आहे. 

राजेंद्र घोरपडे 

सिमेंटच्या जंगलांनी डोळ्यांची रखरख वाढते. ही रखरख मनाचा आनंद हिरावून घेते. पण वृक्षांची हिरवळ त्याच डोळांना गारवा देते, मनाला नवी उभारी देते. आत्मिक शांती देते. यातून मनाला पर्यावरण संवर्धनाची आवड व छंद जडतो. कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांनीही शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा छंद जोपासला. निसर्गाच्या प्रेमापोटी डॉ. प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी स्व-कमाईतून महाराष्ट्र - कर्नाटक सीमेलगतच्या करनूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) गाव शिवारात 22 एकर शेती खरेदी केली. या जागेत त्यांनी वनस्पतींची जैवविविधता जोपासण्याच्या उद्देशाने 15 एकरात वनराई उभारली. यामध्ये त्यांनी विविध फळझाडे, फुलझाडे, त्याचबरोबरीने सागवान, निलगिरीसह विविध उपयुक्त वनस्पतींची लागवड केली. उर्वरित सहा एकरांमध्ये ऊस आणि हंगामानुसार विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
सुमारे वीस वर्षांपूर्वी कृषितज्ज्ञ डॉ. भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रभू यांनी सुरवातीच्या काळात ऊस, केळी, भाजीपाला, फुलशेती लागवडीचे प्रयोग केले. काही क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीनेही पीक व्यवस्थापन केले. केळी, फुलशेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापन लागते, सातत्याने पीक वाढीवर लक्ष द्यावे लागते. याचबरोबरीने विक्री व्यवस्था, बाजारपेठेतील चढ उतार पाहावे लागतात. मात्र डॉक्‍टरी व्यवसायातून याकडे त्यांना फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी केळी, फूलशेतीऐवजी फळबाग लागवड, वनशेतीकडे लक्ष दिले. शेतीचा व्यावसायिक दृष्टिकोन थोडासा बाजूला ठेवून आपल्या आवडीनुसार पिकांची निवड आणि लागवडीचे नियोजन त्यांनी केले. उपलब्ध लागवड क्षेत्राचा विचार करता त्यांनी फळबागेतून माळ परिसर हिरवागार करण्यावर भर दिला. केवळ एकाच प्रकारच्या फळपिकाची लागवड करण्याऐवजी विविध फळझाडांच्या लागवडीचे त्यांनी नियोजन केले. पहिल्या टप्प्यात शेतीचे नियोजन करताना दर शनिवारी डॉ. प्रभू कागलमधील शेती अधिकारी के. एल. पाटील तसेच कोल्हापुरातील कृषितज्ज्ञ श्री. दप्तरदार यांना सोबत घेऊन शेतावर जात. प्रत्यक्ष शेतावर शनिवार - रविवार तज्ज्ञांशी चर्चा करून नेमक्‍या कोणत्या पिकांची लागवड करायची याचे नियोजन त्यांनी केले. याचबरोबरीने परिसरातील शेतकरी तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशीही संपर्क ठेवला. त्यातून नवनवीन माहिती त्यांना मिळत गेली.
सुमारे पंधरा एकरांवर विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, तसेच उपयुक्त वनस्पतींची लागवड डॉ. प्रभू यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले की, एखादी वनस्पती, फळझाड आवडले की ते मी लगेच आणून स्वतःच्या शेतात लागवड करतो. काही मित्रांनीदेखील विविध फळझाडे, फूलझाडांची रोपे भेट दिली आहेत. सध्या माझ्या शेतपरिसरात विलायती चिंच, आवळा, काजू, करवंद, जांभूळ, डाळिंब, तुती, नीरफणस, शेवगा याचबरोबरीने गुलमोहर, बहावा अशी विविध प्रकारची झाडे-झुडपे, फुलझाडे लावली आहेत. यातून शेतपरिसरात छोटे वन तयार झाले. सध्या माझ्या शेतात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, पेरू अशी सुमारे तीनशेच्या वर फळझाडे आहेत. काही क्षेत्रांवर बांबू तसेच सागवानाची लागवड केली आहे. शेतीला निलगिरी आणि सुरूच्या झाडांचे कुंपण केले आहे. नफ्यातोटाचा विचार न करता या माळरानावर "ग्रीन स्पेस' तयार करण्यावरच माझा भर आहे.

कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फळबाग आणि वनशेती ः 
फळबाग लागवडीबाबत डॉ. प्रभू म्हणाले की, मी पहिल्यांदा विविध फळझाडांची माहिती घेतली. त्यातील लागवड तंत्र समजावून घेतले. यासाठी मला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. नाडकर्णी यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले होते. मुरमाड लाल मातीत लागवडीसाठी फळपिकांच्या नेमक्‍या कोणत्या जाती निवडाव्यात याची माहिती डॉ. नाडकर्णी यांनी दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रातून नारळाची बाणावली, आंब्याची हापूस, रत्ना, पायरी, केसर या जातींची कलमे खरेदी केली. वनीकरणाची आवड असल्याने मी वेंगुर्ले आणि कागल येथील रोपवाटिकेतून सागवानाची रोपे खरेदी केली. आत्तापर्यंत हलक्‍या जमिनीत मी सुमारे चारशेच्या वर सागवानाची रोपे लावलेली आहेत. वनराईत मी सिट्रोनेलाची ठिकठिकाणी लागवड केली आहे.
शेतीच्या देखभालीसाठी मी शेतावर दोन कुटुंबे ठेवली आहेत. गेली दहा वर्षाहून अधिक काळ ते शेतीची देखभाल करत आहेत. शेतातून येणाऱ्या उत्पन्नातूनच शेतीसाठी लागणारा सर्व खर्च भागविण्याची जबाबदारी या कुटुंबावर मी टाकलेली आहे. यामुळे आता मला शेती व्यवस्थापनासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. गरजेनुसार रोजंदारीवर मजूर घेऊन फळबागेला खते देणे तसेच गरजेनुसार शेती मशागतीची कामे केली जातात. शेतावरील या कुटुंबांनी गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या पाळल्या आहेत. यातून फळबागेला पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध होते. शेतीची सर्व देखभाल ही दोन्ही कुटुंबे पाहात असल्याने मला फारसे व्यवस्थापनात लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे मी शेतीमधील नवीन लागवड प्रयोगाबाबत विचार करतो.

फळबागेत मोरांचा वावर 
वाढत्या वसाहतवादाने गावपरिसरातही पक्ष्यांचा निवारा नष्ट झाला आहे. पक्ष्यांची संख्या घटत आहे. परंतु करनूर गावाच्या परिसरात डॉ. प्रभू यांनी तयार केलेल्या या वनराईत विविध पक्ष्यांना निवारा मिळाला. वनराईने नटलेल्या परिसरात वृक्ष्यांच्या गार सावलीमुळे पशुपक्ष्यांचा वावर वाढला. या वनात आता मोरही दिसू लागले आहेत. विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांसाठी निवारा निर्माण केल्याचे एक वेगळेच समाधान डॉ. प्रभू यांना आहे.

कूपनलिका, विहीर पुनर्भरणाने शाश्‍वत पाणी 
शेतीला बारमाही पाण्याचा पुरवठा असेल तरच बागायती शेती करणे शक्‍य होते. याचा विचार करून पाण्याच्या सुयोग्य वापराचे नियोजन डॉ. प्रभू यांनी केले. माळ जमीन असल्याने डॉ. प्रभू यांना उन्हाळ्यात फळबाग आणि वनशेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवत होती. यावर मात करण्यासाठी डॉ. प्रभू यांनी विहीर पुनर्भरणाचा प्रयोग केला. त्यांच्या शेतातून ओढा जातो. या ओढ्याला पावसाळ्यात पाणी असते. हे पाणी डॉ. प्रभू यांनी विहीर आणि कुपनलिकेमध्ये सोडून पुनर्भरणाचा प्रयोग केला. गेल्या काही वर्षात सातत्याने जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने शेत परिसरातील भूजलाचा स्तर वाढून उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर त्यांना मात करता आली. उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी त्यांनी फळबागेत ठिबक सिंचन केले आहे. फळझाडे आणि वनीकरणामुळे उन्हाळ्यातही शेतीचा परिसर हिरवागार झाला आहे.

मित्र आणि कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप 
फळबागेतून डॉ. प्रभू यांना आंबा, चिकू, नारळ, काजू या फळांचे उत्पादन मिळते. शक्‍य होईल तितक्‍या फळांची विक्री कागलच्या बाजारपेठेत केली जाते. शेतातील सर्वच फळांची विक्री देखभालीसाठी ठेवलेल्या कुटुंबाना गावातच करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे जास्तीच्या फळांचे मोफत वाटप डॉ. प्रभू कोल्हापूरातील मित्र परिवार तसेच स्वतःच्या हॉस्पिटलमधील दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांना करतात.

सौर ऊर्जेचा वापर 
डॉ. प्रभू यांनी कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलच्या परिसरात छोटीशी बाग फुलवली आहे. या बागेस पाण्याचा व खतांचा योग्य वापर होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा सौर ऊर्जेवर कार्यरत आहे. निसर्गातील उपलब्ध शक्तीचा पुरेपूर वापर करून नैसर्गिकरीत्या हिरवळ निर्माण करण्यावरडॉ. प्रभू यांना विशेष रस आहे.

संपर्क ः डॉ. संतोष प्रभू ः 0231-2644881