Tuesday, March 27, 2018

हो मी सायकल वापरतो...

आज काल सायकल वापरतो असे म्हटले तर थोडे आश्‍चर्य वाटण्यासारखे आहे. त्यात रोज ऑफिसला सायकल घेऊन येतो, असे सांगितले तर काय म्हटले जात असेल हे इथे न सांगितलेलेच बरे. पण हो मी रोज ऑफिसला सायकलने जातो. त्यात मला कधी लाज वाटली नाही. कोण काय म्हणेल याची मी कधीही फिकिर केली नाही. मला जे वाटते, माझ्या मनाला जे पटते तो विचार मी मनापासून जोपासतो. तो मी माझा छंदच समजतो. माझ्या मनाला वाटते मी सायकल वापरावी, म्हणून मी रोज सायकलने ऑफिसला जातो. तसे याला कोणी विरोध केल्याचे मला तरी आठवत नाही. तसे टिंगलही कोणी केल्याचे मला आठवत नाही. माझ्या पाठीमागे बोलत असतील, पण ते मला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यापासून दुःखी होण्याचा काही प्रश्‍नच येत नाही. ऑफिसला सायकल घेऊन आल्याने स्वतःची पत कमी होते असे मला तर कधी वाटले नाही. कदाचित ऑफिसमध्ये याबाबत वेगळा विचार केलाही जातही असेल पण माझ्या निदर्शनास तरी कधी आले नाही. त्यामुळे यावर न बोललेलच बरे..

गेली सात आठ वर्षे रोज सायकल वापरतो. पण आजच हे सांगावे का वाटले असा प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. कारण ही तसेच आहे. पर्वा रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास ऑफिसला निघालो होतो. वाटेत आयटीआय संभाजीनगर दरम्यान एक सद्‌गृहस्थ भेटले. तेही सायकलवर होते. आयटीआयपासून संभाजीनगरकडे येताना थोडी चढण आहे. साहजिकच त्यांच्या व माझ्या सायकलचा वेग थोडा मंदावला. त्यांनी माझ्याकडे आश्‍चर्याने पाहात विचारले, "रोज सायकल चालवता.' मी म्हटले "हो' ही सायकल घेऊन सात-आठ वर्षे होत आली. तेव्हापासून रोज मी सायकल चालवतो.

त्यांना थोडे आश्‍चर्य वाटले. पण मी रोज सायकलने ऑफिसला जातो म्हटल्यावर ते थोडे थांबले व त्यांनीही मला थांबायला सांगितले. मी ही थांबलो. ऑफिसला आणि सायकल म्हटल्यावर कोणालाही आश्‍चर्य वाटणार यात मला फारसं काही वाटले नाही. कारण आत्तापर्यंत हा प्रश्‍न मला कित्येकदा अनेकांनी विचारला आहे. यामुळे मलाही त्यात फारसं काही वाटले नाही. पण त्यांना माझी चौकशी करावी वाटली म्हणून मी ही थांबलो, कारण तेही सायकलवर होते. त्यांनी सांगितले आमचा एक सायकल चालवणाऱ्यांचा गट आहे. आम्ही दर रविवारी एखादे ठिकाण शोधतो व तेथे सायकलने जातो. त्यांनी मलाही या गटात सामिल होण्याचे निमंत्रण दिले. मी ही ते स्वीकारले. पण इतक्‍या वर्षात आत्तापर्यंत असे कोणी भेटले नव्हते. इतक्‍या आत्मियतेने त्यांनी माझी चौकशी केली, याचे मला समाधानही वाटले. म्हणून मला आज हे लिहावेसे वाटले. अशी चौकशी करणारी माणसे फारच थोडी आहेत. त्यात सायकल वापरणाऱ्या माणसांची चौकशी म्हणजे विरळच. पण मला एक समाधान वाटले.

व्यायामासाठी सायकल चालवणारे अनेकजण आहेत. दररोज सकाळी भेटत असतात. त्यामुळे सायकलचे महत्त्व काय आहे, हे मला सांगावेसे वाटत नाही. ज्याची त्याची आवड असते. मला सायकल चालवायला आवडते. तो मला छंद आहे. अगदी लहानपणापासून मला सायकल चालवण्याचा छंद आहे. लहानपणी पाचवी-सहावीला असताना मी सायकल शिकलो. तेव्हा आमच्याकडे सायकल नव्हती. रूकडीमध्ये आम्ही राहायला होतो. तेव्हा सायकली भाड्याने मिळत असत. वीस पैसे अर्धा तास व तीस पैसे तास असा दर होता. आम्ही एक तास सायकल चालवत होतो. लहान सायकली होत्या. त्यावर बसता येत नव्हते. मग नळीच्या खालून दुसऱ्या बाजूच्या पायंडलवर पाय टाकून सायकल पळवत होतो. मागे एकजण धरायला असायचा. वेग वाढला की मागच्याचा हात सुटायचा, तसा आमचा बॅलन्सही सुटायचा. बऱ्याचदा पडायचो. पण सायकल शिकलो. रुकडी ग्रामपंचायतीच्या आवारात मोकळे पटांगण होते. या पटांगणात गोल गोल फेऱ्या मारून सायकल शिकलो. आजही ते दिवस आठवतात. कारण सायकल हे तेव्हाचे प्रिय वाहन होते. गाडी फारशी कोणाकडे नसायची. तेव्हा सायकल हेच लोकप्रिय वाहन होते. दुचाकी असणे हे त्या काळात प्रतिष्ठेचे समजले जायचे.

सायकलचे किस्से खूप सांगता येतील. तसे या विषयावर पुस्तकही होऊ शकते. कधी वेळ मिळालच तर नक्कीत हे पुस्तक लिहता येईल. एकदा तर मी कोल्हापूरातील साळोखेनगरमधून रूकडीला सायकलवरून गेलो होतो. त्यावेळी सर्वानीच आश्‍चर्य व्यक्त केले होते. जवळपास 20 किलोमीटरचे हे अंतर पण सायकलने प्रवास. घरात समल्यावर तर आईचा पाराच चढला होता. कारण वय अवघे पंधरा-सोळा वर्षे होते. इतक्‍या लहान वयात सायकलने प्रवास करणे योग्य वाटत नव्हते. त्याकाळात सायकल हेच एकमेव साधन असल्याने आम्ही बऱ्याचदा शेजारच्या गावात जाताना सायकल वापरत असू.
दिपावली-उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला रूकडीतून सायकलने जाणे हा तर नेहमीचा उपक्रम होता. वाटेत नदी आहे. उन्हाळ्यात नदीत पाणी नसते. त्यामुळे पात्रातून सायकल न्यायला काही अडचण येत नसे आणि पाणी असलेच तरी नदीत नावही असायची. त्यावरून नदी पार करता येणे शक्‍य होत असे. बऱ्याचदा सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला सायकलने जाण्याचा योग आला. कधी रूईच्या धरणावरून तर कधी चिंचवडमार्गे नावेतून किंवा पंचगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून सायकल घेऊ गेलो. रेल्वे पुलावरून एका पतऱ्यावरून चालत जावे लागते. तो अनुभव खूपच रोमांच आणणारा आहे. खाली पाहीले तर खोल पाणी, आजूबाजूला पाहीले तर हिरवेगार रान. पण नजर फिरवायचेही धाडस व्हायचे नाही. पाय थरथरत कसाबसा पुल पार करायचा. त्यात रेल्वे येण्याचीही भीती असते. असे लहानपणीचे सायकलचे किस्से सांगता येण्यासारखे आहेत. पण त्याकाळात सायकल व्यतिरिक्त अन्य साधन फारसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सायकल हाच प्राधान्यक्रम होता.

आता काळ बदलला आहे. अहो दुचाकी काय आता चार चाकीशिवाय ऑफिसला जाता असे सांगणे म्हणजे स्वतःची अब्रु घालवून घेण्यासारखे आहे. पण पर्यावरणाचाही विचार आता करण्याची गरज आहे. आपण गाड्या वापरतो. किती प्रदुषण करतो. याचा कधी विचार केला नसेलही, पण पर्यावरण संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. यासाठी गाडीचा वापर किती करायचा, कधी करायचा याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा. केवळ प्रतिष्ठेपोटी गाडी वापरणे हे काही शहाणपणाचे लक्षण आहे. असे मला कदापी वाटत नाही. पर्यावरणाच्या नुसत्या गप्पा मारणे वेगळे, पण पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊन प्रदुषण कसे कमी करता येईल, याचा जास्तीत जास्त विचार स्वतःपासूनच करायला हवा. इतरांना पटो न पटो पण आपण सायकल चालवून प्रदुषण कमी करू शकतो. यासाठी सायकल वापरण्यास प्राधान्य द्या, असे मला मनापासून सांगावेसे वाटते. कसली आली चंगळवादाची प्रतिष्ठा. सायकल चालवणे हेच खरे प्रतिष्ठेचे लक्षण आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. वाढत्या तापमानावर आता सायकल चालवणे हाच उपाय ठरू शकतो. एक दिवस सायकलने प्रवास करून बघा, तुम्हाला रोज सायकल चालवावी असे वाटेल. हा प्रयोग करून तरी पाहा. केवळ सायकल डे चे निमित्त नको किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सायकल चालवणे नको, सायकल चालवण्याचा आनंद मनापासून घ्यायला हवा. तो आनंद आपल्यामध्ये साठवायला हवा. त्यातूनच मनाला खरे समाधान मिळू शकेल.

आज मला काही सायकल चालवणारे सवंगडी भेटले आहेत. तुम्हालाही असे सवंगडी भेटतील. आज मी ताठ मानेने सांगू शकतो. मी एकटा नाही. सायकलने चालवणारा आता गट मला भेटला आहे. गेली सातवर्षे सायकल चालवून पेट्रोलची बचत केल्याचे समाधान काही वेगळेच आहे. पर्यावरण संवर्धनाचा, प्रदुषण मुक्तीचा केलेला हा खटाटोपही मनाला मोठे समाधान देणारा आहे. सायकल चालवल्याने आरोग्य आपोआप सांभाळले जाते. न कळत व्यायाम होतो. कसरत होते, पण यापेक्षा मनाला मोठे समाधान मिळते. म्हणूनच मी सांगेन मोटार गाड्या सोडा आणि आता सायकल चालवा..हो मी सायकल वापरतो असे ताठ मानेने सांगा... 

Sunday, March 4, 2018

ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन

संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माची गुपिते उलगडताना विविध उदाहरणे सांगितली आहेत. यात अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे. विज्ञानातील काही उदाहरणे तर दिली आहेतच त्याबरोबर शेतीशी निगडीतही काही उदाहरणे सांगितली आहेत. अध्यात्म सांगताना समाज प्रबोधनाचेही महान कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे. 

सध्या भारतीय संस्कृतीला, परंपरेला नावे ठेवण्यात येतात. झपाट्याने बदलत चाललेल्या जगाचा वेग ही संस्कृती घेऊ शकत नाही असा अशी मतेही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. या संस्कृतीचा विचार आता सोडून दिला तरच आपण जगासोबत स्पर्धा करु शकू अन्यथा आपले भवितव्यही बिकट होईल अशी भीती दाखवली जात आहे. या अशा विचारांमुळे आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. पाश्चात संस्कृतीचे अनुकरण आपण करत आहोत. पण प्रत्यक्षात पाहिले तर आपण आपली संस्कृतीच योग्य प्रकारे अभ्यासत नसल्याचे दिसून येते. आपल्या संत महापूरषांनी सांगितलेली वचनेच आपण योग्य प्रकारे आत्मसात केलेली नसल्याने आपली पिछेहाट होताना दिसत आहे. 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून अध्यात्मासह शेतीतील तंत्रज्ञानाबाबतही प्रबोधन केले आहे. आपल्या देशात बाराव्या शतकात ठिबक सिंचन होते. हे ज्ञानेश्वरीतील ओवीतून स्पष्ट होते. 

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे । जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। २५ ।। अध्याय १ ला

आपले जीव प्रफुल्लीत करण्यासाठी सद् गुरुंची उपासना करावी, सद् गुरुच अद्यात्मिक प्रगतीचे मुळ आहे. यासाठी त्यांच्याच भक्तीची गरज आहे. तरच हा आत्मज्ञानाचा, परमार्थाचा वटवृक्ष जोमात वाढेल. हे सांगताना ज्ञानेश्वरांनी येथे झाडाला पाणी देताना ते त्याच्यामुळाशी द्यावे म्हणजे त्याची वाढ उत्तमप्रकारे होते असे उदाहरण दिले आहे. ठिबक सिंचनामध्ये आपण हेच तर करतो. म्हणजे त्या काळात हे ज्ञान अवगत होते. ठिबक सिंचनाच्या पद्धती त्या काळात वेगळ्या होत्या. मडक्याला छोटेसे छिद्र पाडून ते मडके झाडाच्या मुळा शेजारी पुरले जायचे. त्या मडक्यात पाणी घालून ते झाडाच्या मुळाशी देण्याची पद्धत त्या काळात होती. हा ठिबक सिंचनाचाच प्रकार आहे. म्हणजे हे तंत्र भारतात होते. या तंत्रज्ञानाबाबत संतांनी प्रबोधन केल्याचेही दिसून येते. 

पशू, पक्षी, किटक आदींचा बारकाईने अभ्यासही भारतीय संस्कृतीत केला गेलेला आढळतो. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या विविध उदाहरणातून हेही स्पष्ट होते.

 देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासिं झोंबे जैसा । सांगे नरू केवीं तैसा । पावे वेगां ।। 41 ।। अध्याय 1 ला 

पक्षी फळ दिसले तर लगेच ते खाण्यासाठी जात नाही. प्रथम तो त्याचे निरिक्षण करतो. आसपासचा परिसर पाहातो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. त्यापासून कोणता धोका आहे का हे ही पाहातो मगच तो खाण्यासाठी धावतो. या उदाहरणातून आपल्या संस्कृतीमध्ये पक्षांची निरिक्षणेही केली जात होती. त्याच्या प्रत्येक हालचालींचा अभ्यास केला जात होता. हे यातूनस्पष्ट होते.

 पैं आघविया जगा जें विख । तें विख कीडिया पीयूख । आणि जगा गुळ तें देंख । मरण तया ।। 930 ।। अध्याय 18 वा 

इतर जीवांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य आहे. अशा किटकांना गुळा सारखे गोड पदार्थ हे विष ठरतात. कलमथ नावचे एक तण आहे. ते खाल्ल्याने जनावरे दगावतात. हे तण मेंढ्यांनी खाल्यास त्यांची लोकर गळते. या तणामुळे दुग्ध जनावरांची दुध उत्पादनाची क्षमता घटते. जनावरांचे वजन झपाट्याने कमी होते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्राद्रुर्भाव झाला होता. त्यावेळी त्याचे नियंत्रण जैविक पद्धतीने करण्यात आले. हे तण इतरांसाठी विष जरी ठरत असले तरी त्यावर काही किटक जगत होते. त्या किटकांनी हे तण नष्ट केले. संशोधकांनी 1950 मध्ये हे तण खाणारे बिट्टल्स सोडून हे तण नष्ट केले. हे आत्ताच्या अलिकडच्या 19 व्या शतकातील उदाहरण आहे. पण पूर्वीच्या काळी आपल्या भारतदेशात असे प्रयोग आपल्या सांधुसंतांनी केले आहेत. 

ज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकात लिहिलेल्या या उदाहरणावरून स्पष्ट होते. 
एके पवनेंची पिती । एकें तृणास्तव जिती । 
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। 38 ।। अध्याय 7 वा

 कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते. सर्व अंगानी दूरदुष्टीने आपली विधाने मांडली होती. याचे फायदे तोटे अभ्यासले होते. त्यातून कशा प्रकारे प्रबोधन करायला हवे याचाही अभ्यास केला होता. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या अशा अनेक उदाहणातून हे स्पष्ट होते. आपले साधूसंत हे खरे संशोधक होते. त्यांनी केलेला अभ्यास आपल्यासाठी आजही उपयुक्त आहे. आपल्यासाठी मार्गदर्शकआहे. याचा विचार करून आपण आपल्या संस्कृतीला नावे न ठेवता त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा. आजच्या बदलत्या युगातही हे तत्त्वज्ञान आपल्यासाठी मार्गदर्शकच ठरणारे आहे. विकासाने वेग जरी पकडला असला तरी साधुसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा बोधच या विकासाला चालना देऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

 बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामायें ।
 ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाती न नशे ।। 59 ।। अध्याय 17 वा
 माणसाचे त्रिगुण ही अनंत जन्मे जन्मांतरे झाली तरीही बदलत नाहीत हे सांगण्यासाठी माऊलीने बीजाचे उदाहरण दिले आहे. बीजापासून झाड होते त्या झाडापासूनच पुन्हा बीज मिळते. हे चक्र कोट्यावधी वर्षे चालत आले आहे. यात पारंपारिक जातीच्या बीजाचा नाश कधीच होत नाही. पिकाच्या पारंपारिक जाती आता कालबाह्य होत आहेत. कारण त्याची लागवडही आता कमी झाली आहे या बरोबरच त्याचे बीजही आता साठवले जात नाही. पारंपारिक जातीच्या बीज संवर्धनाची गरज आहे. कारण संकरित बियाणे हे एकदाच उगवते. त्यापासून उत्पादित धान्य हे बीज नसते. त्याची लागवड करता येत नाही. पण पारंपारिक जातींमध्ये हे नसते, पण आता अशी बियाणे दुर्मिळ होऊ लागली आहेत. पारंपारिक जातीच्या संवर्धनासाठी गरज आहे. संकर झाल्याने जाती नष्ट होत आहेत. पण या संकरित बियाण्याची चव, गुणवत्ता आणि पारंपरिक चव आणि गुणवत्ता यामध्ये मोठा फरक आहे. संरकित बियाण्यास आता चवच राहीली नाही संकरित बियाण्याची गुणवत्ताही थोड्या कालवधीने कमी होते. यातून देशी बियाण्यांचे संवर्धन का गरजेचे आहे हे ही स्पष्ट होते. 

नाना उंसाची कणसें । कां नपुंसके माणुसें । 
वन लागलें जैसें । साबरीचें ।। 576 ।। अध्याय 18 वा 



उसाला तुरे लागायला सुरवात झाली तर त्या उसापासून साखर फारशी मिळत नाही. तो ऊस निरपयोगी असतो. असे माऊलीने बाराव्या शकतात सांगितले आहे. नपुसक माणसे आणि वनात सांबरिचे झाडे हे बिनकामाचे आहे. तसे उसाला कणसे आल्यानंतर त्यातील साखरेचे प्रमाण घटते यासाठी उसाचे गाळप योग्य वेळी होण्याची गरज आहे. हे शेतीतील प्रबोधनचे आहे ना. संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात प्रबोधनाचे मोठे काम केले. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उदाहरणे देऊन अध्यात्माचे बीज रोवले. प्रबोधनही केले. 

Friday, May 5, 2017

स्वेटर उद्योगातून दिला महिलांना रोजगार


 कोल्हापूर शहराच्या रमणमळा परिसरातील मालती माधवराव बेडेकर यांनी घरची शेती सांभाळत स्वेटर विणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या तीस वर्षांत त्यांनी या व्यवसायात चांगले यश मिळविले. स्वतःसह शेजारच्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन कायम स्वरूपी रोजगार मिळवून दिला. 

राजेंद्र घोरपडे

एखाद्या कामाची आवड असेल तर त्यात निश्‍चितच मोठे यश मिळते. कोल्हापूर शहरातील मालती माधवराव बेडेकर यांना स्वेटर विणण्याची आवड होती. मालतीताई लग्नानंतर कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या रमणमळा येथे राहाण्यास आल्या. त्यांचे पती कोल्हापूर शुगरमीलमध्ये नोकरीस होते. रमणमळा येथे घरालगतच बेडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आणि गुऱ्हाळ होते. सहा गायी, दोन म्हशी यांचा सांभाळ करत त्यांनी शेतीत विविध पीकपद्धतीचे प्रयोगही केले. सहा वर्षे मत्स्यशेती केली. ज्वारी बीजोत्पादनही घेतले. पुढे कोल्हापूर शहराच्या वाढत्या विस्तारात मात्र त्याच्या शेतीला मर्यादा आली.

स्वेटर व्यवसायाला झाली सुरवात ः
घरची कामे झाल्यानंतर फावल्यावेळेत काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक महिलेला असतो. मोकळ्या वेळेत स्वेटर विणणे ही मालतीताईंची आवड. या आवडीनेच त्या स्वेटर निर्मितीत गुंतल्या. यात पुढे विकास करायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मालतीताईंनी मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा "वूलन मशिन निटिंग' हा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली त्यांन स्वेटर निटिंग यंत्र खरेदी केले. तेव्हा या यंत्राची किंमत हजार रुपये होती. स्वेटर विणण्यास सुरवात केली, पण या आधुनिक यंत्राच्या वापराची फारशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी यंत्र खरेदीदाराकडून पुणे येथे यंत्र वापराबाबत प्रशिक्षण घेतले.

ओळखीतून वाढला व्यवसाय
स्वेटरचा वापर हा हंगामी आहे. त्यामुळे हिवाळी हंगामातच स्वेटरला मागणी असते. तरीही जिद्दीने मालतीताईंनी मध्ये निटिंग यंत्राचा वापर करून स्वेटर विणण्यास सुरवात केली. एकमेकांच्या ओळखीनेच स्वेटरची मागणी वाढत गेली. ओळखीतून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या साधकांकडून पांढरे स्वेटर व शाल तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. पहिलीच ऑर्डर असल्याने उत्सुकता होती. या कामात त्यांना त्यांचे पती माधवराव यांनी लोकरीचे गुंडे तयार करण्यासाठी मदत केली. व्यवसायवाढीच्या दृष्टीने मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उत्पादनाच्या विक्रीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महिला उद्योजक समितीतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला.

तीन यंत्रांची खरेदी ः
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असते. च्या काळात बाजारात स्वेटर शिलाईची आधुनिक यंत्रे येत होती. उत्पादनांचा वेग वाढला होता. अशा काळात उत्पादनास असणारी मागणी विचारात घेऊन आधुनिक यंत्रे विकत घेण्याचा विचार मालतीताईंनी केला. अडीच लाखांचे कर्ज घेऊन दोन कॉम्प्युटराईज्ड आणि एक कार्डोमेट्रिक यंत्राची त्यांनी खरेदी केली. या यंत्रावर काम करण्यासाठी कामगारांची गरज होती. अशावेळी त्यांनी अन्य कामगार न निवडता परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. या यंत्रामुळे दिवसाला तीन ते चार स्वेटर विणले जायचे.

महिलांना मिळवून दिला रोजगार ः
स्वेटर व इतर लोकरीची कपडे तयार करताना विविध कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. सध्या मालतीताईंकडे महिला यंत्रावर काम करतात, तर महिलांना हातावरचे काम आहे. लोकरीचे गुंडे, शिलाई या कामासाठी प्रत्येकी दोन महिला आहेत. सहा महिला या दररोजच्या रोजंदारीवर काम करतात. त्यांना कामानुसार महिना तीन ते पाच हजार रुपये इतका पगार दिला जातो. दहा ते पंधरा महिला घरचे काम सांभाळून शिलाई कामात मदत करतात. त्या महिलांना नगास सरासरी रुपये व शिलाईसाठी नगास रुपये दिले जातात. मालती यांच्याकडे स्वेटर शिलाई काम करणाऱ्या काही मुली होत्या. लग्नानंतर त्यांना स्वेटर काम करणे अवघड होते. अशा तीन मुलींना मालतीताईंनी स्वेटर विणण्याचे यंत्र घेऊन दिले. लोकरीच्या वजनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते.
स्वेटर व इतर विविध प्रकारची उत्पादने करण्यासाठी रोज अंदाजे तीन ते चार किलोची लोकर लागते. वर्षाला अंदाजे किलो लोकर लागते. हा सर्व कच्चा माल दिल्ली व लुधियाना येथील मिलमधून मागविण्यात येते. दिवसाला साधारणपणे स्वेटर तयार होतात. महिन्याला अंदाजे हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या स्वेटरचे उत्पादन होते. हंगामानुसार कमी-जास्त उत्पादन होते.

लोकरीची विविध उत्पादने ः
लहानांपासून मोठ्यांसाठी लागणारे विविध प्रकारच्या स्वेटरचे उत्पादन मालतीताई करतात. बेबी सेट, पायमोजे, बंडी, फ्रॉक, लहान मुलांचे स्वेटर, लेडिज टॉप, कुर्तीज, लॉंग स्वेटर्स, कार्डीगन्स, जेन्टससाठी हाफ व फुल हाताचे स्वेटर्स, नेहरू स्वेटर्स, बाहुल्या अशी विविध उत्पादने तयार केली जातात. टोप्या, जर्किनमध्येही विविध प्रकार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीनुसारही विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही दुकानदार पूजेसाठी लागणारे आसन, रुमाल तसेच तोरण आदींची मागणी करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरनुसार मालाचा पुरवठा करण्यात येतो.

प्रदर्शनातून विक्री ः
सुरवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मालतीताई रमणमळा चौकात स्वतः मांडव उभारून स्वेटरची विक्री करीत होत्या. मालतीताईंनी थंडीच्या हंगामात इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, महाबळेश्‍वर, बेळगाव येथे प्रदर्शने भरविली. आता स्वेटरच्या थेट ऑर्डर मिळत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी प्रदर्शने बंद केली. फक्त कोल्हापुरातच दिवाळीनंतर डिसेंबरअखेरपर्यंत प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त स्वयंसिद्धा, भगिनी महोत्सवातर्फे आयोजित प्रदर्शनामध्येही त्या स्वेटरची विक्री करतात. स्वेटर निर्मितीमधील धडपड पाहून त्यांना सकाळ (तनिष्का-मधुरांगण), रोटरी क्‍लब, स्वंयसिद्धा संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.

Saturday, March 25, 2017

मातीच्या कलाकृतींनी दिली सुमनताईंना वेगळी ओळख

कोल्हापूर शहरातील सुमन बारामतीकर यांनी महिला बचत गटाची स्थापना केली. पापड-लोणची, चटणी मसाले या नेहमीच्या उद्योगापेक्षा काहीतरी वेगळा उद्योग असावा, या उद्देशाने मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू तयार करून विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेल्या बारा वर्षांत त्यांनी या उद्योगात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.

राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरातील सुमन चंद्रकांत बारामतीकर यांनी घरकामानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळात स्वतःचा काही लघू उद्योग असावा, या उद्देशाने २००४ मध्ये वरद महिला बचत गट सुरू केला. शिवणकाम, पापड-लोणची, चटणी-मसाले निर्मितीवर महिला बचत गटांचा भर असतो. मात्र, यापेक्षा वेगळे उत्पादन असले पाहिजे असे सुमनताईंना नेहमीच वाटायचे. पण कशाचे उत्पादन करायचे? हा विचार त्यांना नेहमीच सतावत होता. याच काळात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमध्ये चहा पिण्यासाठी मातीचे कुल्हड वापरण्यावर भर दिला होता. मातीचे कुल्हड तयार करण्यासाठी रेल्वेने महिला बचत गटांनाही प्रोत्साहन दिले. रेल्वेच्या आश्‍वासनाचा सकारात्मक दृष्टीने विचार करून सुमनताईंनी मातीचे कुल्हड करण्याचा निर्णय घेतला.
सुमनताईंचे दीर यशोवर्धन बारामतीकर हे खादी ग्रामोद्योगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार सुमनताईंनी खानापूर (जि. बेळगाव) येथे खादी ग्रामोद्योग केंद्राच्या कार्यालयामार्फत मातीपासून कुल्हड तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. कच्चा मालाची उपलब्धता विचारात घेऊन त्यांनी खानापूर येथेच भाडेतत्त्वावर जागा घेऊन कुल्हड उत्पादन सुरू केले; पण काही दिवसांतच रेल्वेने कुल्हडची मागणी बंद केली. त्यामुळे तयार कुल्हड विकायचे कोठे? असा प्रश्‍न सुमनताईंना पडला. हे कुल्हड भांडी म्हणूनही वापरता येऊ शकतात, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी दही भांडी म्हणून त्याची विक्री सुरुरू केली. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमनताईंचा उत्साह वाढला. त्यामुळे त्यांनी मातीपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे ठरवले.

लघुउद्योगाला सुरवात ः


सुमनताईंनी गार्डन पॉट (झाडे लावायच्या कुंड्या) तसेच शोपीस प्रकारामध्ये घंटा, अगरबत्ती स्टॅंड, पेन स्टॅंड, ग्लास, मुखवटे, भातुकलीचा सेट, विविध आकाराचे गणपती, महादेवाची पिंड, वाद्य वाजविणाऱ्या कलाकरांचा सेट, विविध प्रकारचे कॉर्नर पॉट, फुलदाण्या तसेच स्वयंपाक घरात लागणारी विविध आकारांतील दही भांडी, पाण्याचे ग्लास, माठ, मातीचा फिल्टर, मातीची बाटली, दीपावलीनिमित्त दिवे, पणत्यांचे विविध प्रकार आदी उत्पादनांची खानापूर येथे निर्मिती सुरू केली. यासाठी पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली. विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सुमनताईंनी वीस हजार रुपयांचे इलेक्‍ट्रीक व्हील खरेदी केले. सोबत प्रशिक्षित कारागीर घेतले. मातीची भांडी भाजण्यासाठी सध्या त्या लाकडी भट्टीचा वापर करतात. 



वस्तूनिर्मितीबाबत सुमनताई म्हणाल्या, की वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे सहज उपलब्ध होत असल्याने तेथेच उत्पादने घेण्याचा निर्णय घेतला. उत्पादनासाठी मुख्य गरज असते ती मातीची. शोपीससाठी लाल माती, चिकण माती, गाळाची माती व पांढरी माती (शाडू) लागते. स्वयंपाकाच्या भांड्यासाठी लाल माती, चिकण माती, रेती लागते. भट्टीसाठी लाकडे लागतात. बाजारपेठेच्या मागणीनुसारच वस्तू तयार केल्या जातात. दर महिन्याला स्वयंपाकाची भांडी अंदाजे ५०० नग, दह्याची भांडी अंदाजे एक हजार नग, शोपीसचे विविध प्रकार अंदाजे एक हजार नग इतकी निर्मिती केली जाते.
सुमनताईंनी सहा महिला कामगार आणि चार पुरुष कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. यांना वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच सुमनताई स्वतः वस्तू तयार करतात. माती कालवणे, उत्पादनानुसार मातीचे मिश्रण तयार करणे आणि भट्टीसाठी पुरुष कामगार लागतात; परंतु महिला, पुरुष असा फरक न करता वस्तूंच्या नगावर कामगारांचा पगार ठरविला आहे. नियमित काम असतेच असे नाही. तसेच निर्मिती करताना बराच माल वाया जातो. काही वस्तू व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मातीच्या वस्तू असल्याने फुटण्याचा धोका अधिक असतो. हे सर्व टाळण्यासाठी कामगारांना चांगल्या नगाच्या उत्पादनावरच पगार दिला जातो. विविध प्रकारानुसार नगाला ८ ते १२ रुपये कामगारांना देण्यात येतात.

स्वयंसिद्धा, भीमथडीतून वस्तूंची विक्री ः


उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी सुमनताईंना बचत गटाचा मोठा आधार मिळाला. सुमनताईंचे माहेर वडणगे (जि. कोल्हापूर) असल्याने त्यांनी तेथील यशस्वी महिला बचत गटात त्या सहभागी आहेत. जिल्हा परिषदेमार्फत भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनातून विविध वस्तूंच्या विक्रीला व्यासपीठ मिळाले. वर्षातील दहा महिने प्रदर्शनात विक्री होते. सुमनताईंना मुख्य आधार मिळाला तो कोल्हापुरातील स्वयंसिद्धा या संस्थेचा. या संस्थेमार्फत विविध ठिकाणी मोठी प्रर्दशने भरविण्यात येतात. या प्रदर्शनात स्टॉल मांडून विविध वस्तूंची विक्री सुमनताई स्वतः करतात. विविध उत्पादनांची विक्री कशी करावी, यासाठी ग्राहकांशी कसे बोलायचे, कसा व्यवहार करायचा आदीचे मार्गदर्शन स्वयंसिद्धाने त्यांना दिले. याचा त्यांना मोठा फायदा झाला. पुणे येथे भीमथडी जत्रा भरविण्यात येते. या चार दिवसांच्या जत्रेमध्ये विविध वस्तूंची सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे सुमनताई सांगतात. याव्यतिरिक्त खादी ग्रामोद्योग प्रदर्शने, माणदेशी जत्रा तसेच पुणे, सातारा, मुंबई, ठाणे येथे भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उत्पादनांची विक्री सुमनताई करतात. ९५ टक्के मालाची विक्री प्रदर्शनातूनच होते. महिन्याला अंदाजे साठ हजार रुपयांची उलाढाल होते. विविध वस्तूंचे उत्पादन व वाहतूक, कारागिरांचा पगार, इतर खर्च वजा जाता सुमनताईंना महिन्याला पंचवीस हजार रुपये शिल्लक राहतात.

घरच्यांचेही प्रोत्साहन

प्रदर्शनासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी जावे लागते. सततचा प्रवास आणि वाहतूक यामुळे या कामात घरच्यांचा सुमनताईंना मोठा आधार मिळतो. सुमनताईंचे पती चंद्रकांत, मुलगी रूपाली, भाऊ सयाजीराव घोरपडे यांचे सहकार्य लाभते. त्यांच्या सहकार्यामुळेच व प्रोत्साहनामुळे या कामात यश मिळाल्याचे सुमनताई सांगतात. उपक्रमशीलतेची दखल घेत सुमनताईंना स्वयंसिद्धा संस्था आणि भीमथडी जत्रेतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संपर्क ः सुमन बारामतीकर ः ९२२५५१६१९६

Thursday, March 16, 2017

धान्यातील आर्द्रता मोजणारा मापक

ज्वारी, गहू, भात आदी तृणधान्ये कापणीनंतर उन्हामध्ये वाळवली जातात. पूर्वीच्या काळी माळावर मळणी व वाळवण चालायचे; पण सध्या जागेचा अभाव असल्याने धान्य योग्य प्रकारे वाळवले जात नाही. अशा बदलत्या परिस्थितीमुळे धान्य खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान्याची साठवणूकही करण्यासाठी पूर्वीच्या काळी हौद, कणग्या यांचा वापर केला जात होता; पण सध्या पोत्यामध्ये धान्य साठवण्यात येते. धान्यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक ओलावा राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीही त्यावर वाढतात. या प्रकारामुळे हे धान्य खराब होत आहे. हा प्रश्‍न फक्त भारतातच आहे असे नाही, तर जगभर ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जगभरातील कृषी विद्यापीठांत यावर संशोधन केले जात आहे. कॅन्सस विद्यापीठ आणि कृषी संशोधन सेवा यांच्या गटाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणामुळे जवळपास 30 टक्के धान्य खराब होण्यापासून वाचण्यास मदत झाली आहे. कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ पॉल आर्मस्ट्रॉंग आणि कॅन्सस विद्यापीठाच्या संशोधकांनी धान्याच्या पोत्यातील आर्द्रता मोजणारे उपकरण विकसित केले आहे. शेतकऱ्यांना सहजपणे हाताळता येऊ शकेल, असे हे उपकरण आहे. हे उपकरण धान्यातील सापेक्ष आर्द्रता आणि तापमान मोजते व त्यावरून धान्यातील ओलाव्याचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. या उपकरणास जोडलेली सेन्सर नळी थेट पोत्यामध्ये खुपसण्यात येते. यावरून सहा मिनिटांमध्ये त्या पोत्यातील धान्यात किती ओलावा आहे हे स्क्रीनवर दिसते. सध्या हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर इथोपिया, बांगलादेश आणि ग्वाटेमाला या देशांतील शेतकऱ्यांना वितरित केले आहे. हे उपकरण वापरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आर्मस्ट्रॉंग व त्यांचे सहकारी विचारत घेत आहेत. या उपकरणात वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची क्षमता वाढविणे, सहा मिनिटांचा लागणारा कालावधी कमी करणे, स्मार्ट फोनशी हे उपकरण जोडणे आदीवर त्यांचे संशोधन सुरू आहे.

Saturday, March 4, 2017

एबीपीमाझाचे आभार

ऎबीपी माझा तर्फे कोल्हापूरातील सयाजी हाॅटेलमध्ये आयोजित रिइनव्हेंट महाराष्ट्रा ए टेक्नाॅलाॅजी या विषयाच्या सेमीनारमध्ये आज सहभागी होण्याची संधी मिळाली. माझ्या श्री अथर्व प्रकाशनकडून मी सहभागी झालो होतो. कोल्हापूरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. आपणही एक संस्था चालवतो. याची जाणिव कधी मला झालीच नाही. पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करताना या व्यवसायात मी नवे तंत्र पुरेपुर वापरले. नोकरी करत हा व्यवसाय करताना खरंतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच मला प्रोत्साहन मिळाले. खरचं किती सोपे झाले आहे काम याची जाणिव या सेमिनारमुळे झाली. खरंतर प्रथम विश्वासच वाटत नव्हता आपण एक उद्योजकही आहोत याचा...पुस्तक प्रकाशित करणे हे एक आव्हान असते आणि ते खपवणे हे त्याहूनही कठीण काम असते पण हे आव्हान आपण स्वीकारले. त्यात यशही मिळाले साहित्यिक संस्थांचे पुरस्कारही मिळाले. इतके यश आपण मिळवले हजारो-हजारो प्रती खपवून आपण नावही कमावले हे कधी वाटलेही नाही पण या सेमिनारने मला त्याची जाणिव दिली. नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन धंदा आणखी वाढविण्याची उमेद माझ्यात जागी केली. यासाठी संयोजकांचे आभार जरुर मानायला हवेत. एचपीचेही आभार कारण त्यांच्या तंत्रज्ञानानेच आपण हे यश मिळवले आहे. डेलीहंटसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाची साथ तर आहेच. पण याची जाणिव झाली नवी उमेद माझ्यात जागी झाली यासाठी एबीपीमाझाचे आभार जरुर मानायला हवेत...

Thursday, February 23, 2017

कृषी पंढरी - व्हिजन 2050

वाढती लोकसंख्या आणि बदलते जागतिक हवामान यामुळे पुढील काळातील शेतीचा आढावा कृषी संशोधकांना नेहमीच घ्यावा लागतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने व्हिजन 2050 पर्यंतचा आढावा घेत शेतीतील आव्हाने आणि संधी याचा शोध घेतला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार शेतीचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असते. तसेच बदलत्या जागतिक हवामानाचा परिणाम शेतीवर होतो, याचाही विचार मांडणे गरजेचे असते. त्यानुसार संशोधनाच्या पद्धतीही विकसित कराव्या लागतात. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.2246 अब्ज इतकी आहे. 2050 पर्यंत ही लोकसंख्या 24 टक्‍क्‍यांनी वाढेल म्हणजे ती 1.650 अब्ज इतकी असेल. सध्या 31 टक्के जनता शहरात राहते. 2050 पर्यंत हे प्रमाण 55 टक्के इतके होईल. यामुळे पुढील काळात शेतीसमोर अन्नसुरक्षा, अन्नधान्य उत्पादनवाढ, बदलते तपमान, जमिनीचा पोत टिकवणे, जमिनीचे पडणारे तुकडे, पाण्याची टंचाई आणि पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव ही मोठी आव्हाने आहेत. सध्याच्या स्थितीत उत्पादित मालाची साठवणूक व वाहतूक योग्य प्रकारे होत नसल्याने नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. भावी काळात ही नासाडी रोखण्यावर भर द्यावाच लागेल. त्यासाठीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा वापर करावा लागेल. बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. भावी काळात देशाच्या उत्तर भागात व द्वीपकल्पावर पाण्याची टंचाई व पाण्याची गुणवत्ता ही समस्या भेडसावणार आहे. समुद्रातील पाण्यात वाढते क्षारांचे प्रमाण आणि नदी-तलावातील पाण्याच्या वाढत्या तापमानाचा परिणाम माशांचे प्रजनन आणि उत्पादनावर होणार आहे. 2050 पर्यंत गहू आणि मक्‍याचे उत्पादन पाच ते दहा टक्‍क्‍यांनी घटणार आहे. जवळपास देशात 60 टक्‍क्‍यावर कोरडवाहू शेती केली जाते, यालाही मोठा फटका बसू शकतो. असे असले तरी हवामानातील बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेती हा एक घटक असल्याने त्यानुसार शेतीमध्ये बदल करण्याचे आव्हान संशोधकांसमोर असणार आहे. वाढत्या हवा व पाणी प्रदूषणामुळे जमिनीची गुणवत्ताही घसरणार आहे. दरवर्षी भारतात 0.8 मे. टन नायट्रोजन, 1.8 मे. टन स्फुरद, 26.3 मे. टन पालाशची घट होते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात होणारी घट याचेही आव्हान संशोधकांसमोर आहे. भावी काळातील 1498 अब्ज घन मीटर इतकी पाण्याची मागणी राहणार आहे. पण केवळ 1121 अब्ज घन मीटर इतकेच पाणी उपलब्ध आहे. साहजिकच भूजल आणि नदीतील पाण्याचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे आव्हान देशासमोर असणार आहे. जैवविविधता जपली नाही तर उत्पादनावर दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. केवळ चारच पिकांपासून जगातील 60 टक्के अन्न पुरवले जाते. पण या पिकांची घसरणारी जनुकीय विविधता ही मोठी धोक्‍याची घंटा आहे. 1900 पासून शेतकऱ्यांच्या शेतीतील जवळपास 75 टक्के पीक विविधता नष्ट झाली आहे. यासह रोग प्रतिकारकक्षमता असणाऱ्या पाळीव देशी जनावरांच्या जातीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या जनावरांच्या जातींचे संवर्धन हा विषय नेहमीच संशोधन परिषदेच्या अजेंड्यावर राहिला आहे. आशिया आणि आफ्रिकेतील गव्हाच्या 80 टक्के जाती हवेतून पसरणाऱ्या नव्या बुरशीला बळी पडत आहेत, असा अहवाल अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे; तर जनावरांमध्येही श्‍वसनाचे विकार, एव्हीअन फ्लू यासारखे आजार झपाट्याने वाढत असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत विचार करता भावी काळात हवामान, पाणी, जमीन आणि जैवविविधता हे शेतीच्या उत्पादनावर परिणाम करणारे घटक कृषी संशोधकांसाठी आव्हान असणार आहेत.

- राजेंद्र घोरपडे