Thursday, October 2, 2014

'टार्गेट' ठेवूनच शेतीचे नियोजन

'टार्गेट' ठेवूनच शेतीचे नियोजन
राजेंद्र घोरपडे
कोल्हापूर शहरातील आयुर्वेदिक डॉक्‍टर डॉ. धनंजय गिरमल यांनी वडिलोपार्जित दीड एकर शेती न विकता प्रयोगशील वृत्ती जपत ऊस उत्पादनवाढीचे "टार्गेट' ठेवले. प्रयोगशील शेतकरी आणि कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक उत्पादनात सातत्य, पीक बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी आठव्या गल्लीत डॉ. धनंजय जयपाल गिरमल यांचा दवाखाना आहे. तसेच इचलकरंजी शहरातही त्यांचा दवाखाना आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा ते इचलकरंजीला जातात. रविवारचा दिवस मात्र इचलकरंजी जवळील अब्दुललाट (ता. शिरोळ) या गावातील शेतीसाठी राखीव ठेवलेला असतो. दिवसभर थांबून वाटेकऱ्याच्या मदतीने पुढील आठवड्याचे त्यांचे शेतीचे नियोजन चालू असते.

सांगली येथून आयुर्वेद पदवी घेतल्यानंतर डॉ. गिरमल यांनी कोल्हापुरात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांचे वडीलही डॉक्‍टर होते. त्यांचा इचलकरंजी शहरात दवाखाना होता. तेथूनच ते अब्दुललाट गावातील दीड एकर शेतीचे व्यवस्थापन पाहत होते. डॉ. गिरमल यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर शेतीची पूर्ण जबाबदारी डॉ. गिरमल यांच्याकडे आली. केवळ दीड एकर शेती आहे, म्हणून सांभाळण्यापेक्षा ती विकून टाका, असा सल्ला बऱ्याच जणांनी त्यांना दिला. परंतु डॉ. गिरमल यांची शेतीची आवड त्यांना शेती विकण्यास नेहमीच नाकारत आली. काही झाले तरी शेती करायचीच, या जिद्दीपोटी त्यांनी शेतीकडे लक्ष दिले. या शेतीच्या व्यवस्थापनात त्यांना नितीन कल्लाप्पा गिरमल (होगाडे) हे चांगले वाटेकरी मिळाल्याने पीक नियोजनात अडचण आली नाही.

"टार्गेट' ठेवून शेती ः
शेतीत प्रगती करण्याचे नियोजन डॉ. गिरमल यांना गप्प बसू देत नव्हते. उसाचे एकरी शंभर - सव्वाशे टन उत्पादन घेणारे शेतकरी शिरोळ तालुक्‍यात आहेत, मग आपल्या शेतात चाळीस टन इतकेच उत्पादन कसे, हा प्रश्‍न त्यांना नेहमी सतावत होता. या प्रश्‍नातून त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. उत्पादनवाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातील डॉ. अशोक पिसाळ, डॉ. ए. पी. पाटील यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी ऊस उत्पादनवाढीकडे लक्ष दिले. पीक नियोजन केले. याच काळात त्यांनी "ऍग्रोवन'मधील तांत्रिक लेख, शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांची नोंद ठेवण्यास सुरवात केली. त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल केले.

पीक लागवडीचे नियोजन ः
- डॉ. गिरमल यांची शेती पूरक्षेत्रापासून थोड्याच अंतरावर आहे. शेती दीड एकर असल्याने व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांनी ऊस लागवडीवरच भर दिला.
- पारंपरिक पद्धतीने उसाचे एकरी केवळ चाळीस टन उत्पादन मिळायचे. परंतु चांगले बेणे, बेणेप्रक्रिया, सुधारित पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर दिला, तर निश्‍चितपणे उत्पादनात वाढ होते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी वाटेकऱ्याच्या मदतीने नियोजन केले. दरवर्षी किमान पाच टनांनी ऊस उत्पादनवाढीचे टार्गेट ठेवले.
- काही वेळा नियोजनात चूक होते, अपेक्षित पीक उत्पादन येत नाही. परंतु निराश न होता चुकांची दुरुस्ती आणि अभ्यास करून पुढील वर्षीच्या पीक नियोजनात सुधारणा केली जाते.
- डॉ. गिरमल उसाची लागवड जूनमध्ये न करता ऑगस्टमध्ये करतात. त्यापूर्वी साडेचार फुटांवर सऱ्या पाडून पावसाच्या पाण्यावर सोयाबीनच्या जेएस-335 या जातीच्या बियाण्याची सरीच्या एका बाजूला एक फूट अंतरावर टोकण करतात. सोयाबीन पेरणीपूर्वी बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केली जाते. एक एकरासाठी आठ किलो बियाणे लागते. तीन महिन्यांत सोयाबीन कापणीयोग्य होते. कापणीनंतर सोयाबीनचा पाला, कुट्टी सरीत कुजवली जाते. चांगल्या शेणखताची उपलब्धता नसल्याने सोयाबीनचा पाला फायदेशीर ठरतो.
- सोयाबीनचे अंदाजे आठ क्विंटल उत्पादन मिळते. त्यातील चौथाई वाटेकऱ्यास दिली जाते. सोयाबीन पिकास सरासरी सहा हजार रुपये व्यवस्थापन खर्च येतो. सोयाबीन विक्रीतून सरासरी सोळा हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.
- उसाच्या को-265 या जातीची लागवड सोयाबीन काढणीच्या वेळी करतात. पाच वर्षांपूर्वी ऊस लागवड करताना ते बेणेप्रक्रिया करत नव्हते, परंतु बेणेप्रक्रियेचे फायदे लक्षात आल्यानंतर आता ते बेणे लागवड कीडनाशक, तसेच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करूनच करतात.
- शिफारशीनुसारच रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून आहे. पिकाच्या गरजेनुसारच पाणी व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये एक आड एक सरी पाचट कुजविले जाते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि ऊस उत्पादनात फरक दिसतो आहे.
- पूर्वी उसाचे एकरी 40 टन उत्पादन येत होते. आता एकरी सत्तर टनांपर्यंत उत्पादन पोचले आहे. तसेच खोडव्याचे उत्पादन एकरी 50 ते 55 टनांपर्यंत मिळते.
- शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्यातील कृषी अधिकाऱ्यांचेही ते मार्गदर्शन घेतात.

वाटेकऱ्यास चौथाई
शेतीमध्ये मजुरांची मोठी कमतरता आहे. मजुरांच्या कमतरतेमुळेच ते स्वतः मजुरांचे नियोजन करीत नाहीत. वाटेकरी मजुरांचे नियोजन करतो. वाटेकऱ्यास उत्पन्नातील चौथा हिस्सा दिला जातो. तसेच शेतीसाठी लागणारा सर्व खर्च स्वतः डॉ. गिरमल करतात. सोयाबीनचे दीड एकरातून दोन ते चार क्विंटल व उसाचे 17 ते 20 टनांचे उत्पन्न वाटेकऱ्यास मिळते.

औषधी वनस्पतींची लागवड ः डॉ. गिरमल यांनी इचलकरंजी येथील घराच्या परसबागेत कोरफड आणि अडुळसा लागवड केली आहे. कोरफडीचा रस आणि खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलाच्या मिश्रणातून त्यांनी आयुर्वेदिक तेल तयार केले आहे. केसांच्या समस्येवर हे तेल उपयुक्त ठरले आहे. येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार औषधे मिळावीत हाच त्यामागचा उद्देश आहे. कफ, दम्याच्या औषधांसाठी अडुळशापासून त्यांनी औषधे तयार केली आहेत. शेतीची आवड असल्याने औषधी वनस्पतींची लागवड करून त्यापासून उपयुक्त औषधी बनवून ते रुग्णांना देतात.

"ऍगोवन' हा खरा मार्गदर्शक... दै. ऍग्रोवनमधील विशेष पुरवण्या, तांत्रिक लेख आणि यशोगाथांनी डॉ. गिरमल यांना शेती प्रगतीची दिशा दाखविली. याबाबत ते म्हणतात, की उसाविषयीची सर्व माहिती मी संग्रहित केली आहे. त्याचबरोबरीने भाजीपाला पिके, चारा पिके, जनावरांसाठी मुरघास, आंतरपीक पद्धती याविषयांच्या लेखांचाही संग्रह केला आहे. पुढे शेतीमध्ये पीक बदल करताना हा संग्रह दिशा देणारा आहे. शेतीमधील अनुभव आणि माहितीच्या संग्रहामुळे पुढच्या पिढीमध्येही शेतीची आवड निर्माण झाली आहे.

पुढील टप्प्यातील नियोजन...
- एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे टार्गेट, त्यादृष्टीने पीक व्यवस्थापनावर लक्ष.
- प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांशी सातत्याने चर्चा करून पीक बदलाबाबत सल्ला.
- जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर भर.
- ऊस, सोयाबीन बरोबरीने काही प्रमाणात भाजीपाला लागवडीचे नियोजन.
- येत्या काळात अजून काही जमीन खरेदी करणार.

संपर्क ः डॉ. धनंजय गिरमल ः 9423858765

Wednesday, September 17, 2014

सुख - निद्रा

सांग विस्तवाचे । अंथरुणावरी । लागेल का तरी । सुख-निद्रा ।। 946 ।।
स्वामी स्वरूपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

आपल्या नावडत्या गोष्टींनी आपले मन विचलित होते. पण आवडत्या गोष्टींनीही आता मन विचलित होऊ लागले आहे. बदलती संस्कृती, वॉट्‌सअँप, स्मार्टफोनच्या जमान्यात साधा फोन जरी आला नाही, संवाद झाला नाही, पोस्ट टाकली नाही, कोणी लाईक केले नाही यामुळेही बेचैनी वाटू लागते. सारा वेळ यामध्येच जाऊ लागला आहे. संवाद आता कृत्रिम झाला आहे. विचार शांत होण्याऐवजी तो वेगाने वाढतच आहे. अशाने मनाची शांतीच नष्ट झाली आहे. विस्तवाच्या अंथरूणावर झोपण्याचा प्रयत्न केल्यास झोप कशी लागणार? पण आता नव्या जमान्यात या विस्तवाच्या अंथरुणावरच झोपावे लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्याची सवय आता करावी लागणार आहे. बदलत्या परिस्थितीत कसे वागायचे, हे अध्यात्म शिकवते. काळ बदलला आहे. या परिस्थितीत मनाचा समतोल ढळू देऊ नये. कोणी पोस्ट टाकली नाही, कोणी आपला विचार केला नाही, कोणी बोलले नाही म्हणून नाराज होण्याची गरज नाही. मनाचा समतोल ढळू न देणे हेच अध्यात्म शिकवते. मन शांत ठेवावे, मनातील विचार शांत व्हावेत. यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठीच साधना आहे. साधनेने हे साध्य होते. पण साधनेतही मन रमत नाही. विचार राहात नाहीत. साधना करतानाही मोबाईलची रिंगटोन वाजते. कोणाचा मेसेज असेल या उत्सुकतेने आपण त्याकडे वळतो. इतकी सवय या मोबाईलची झाली आहे. रटाळ मेसेज असेल तर मन भडकून उठते. आता ठरवायचे साधनेच्या वेळेत फोन कडे लक्ष द्यायचे नाही. थोडावेळ तरी शांत बसता आले तरी आपण नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होऊ. पण निर्णयच घेतला नाही, मोबाईल मागे धावतच सुटलो तर मग शांती कशी मिळेल. मोबाईल ही सुख वस्तू आहे. त्यापासून सुख घ्यायला हवे. पण मनाची शांती विचलित करून दुःख देत असेल तर त्यातील सुख कसे मिळवता येईल याचा विचार करायला हवा. सुखाच्या वस्तूतून समाधान घ्यायला शिकले पाहिजे. सुख-दुःखाचा विचार करत न बसता मनाला या विस्तवावर झोप लागेल याकडे लक्ष द्यायला हवे. तशी सवय अंगी लावायला हवी. बदलते जग वेगाने बदलत आहे. हा वेग पकडण्याच्या मागे आपण लागलो आहोत, पण सुखाने त्याचा वेग पकडायला हवा. दुःख गिळायला शिकले पाहिजे. तितके सामर्थ्यवान आपण व्हायला हवे. सुख-दुःख पचविण्यासाठी साधनेची गरज आहे. शांतीची गरज आहे. मनाला ही सवय लावायला हवी. तरच मनशांती भेटेल.

Tuesday, September 9, 2014

समर्पण

समर्पण

म्हणोनि उचित । कर्मे ती आघवीं । मज समर्पावी । आचरोनि ।।311।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी ते पुस्तक सद्‌गुरुंना अर्पण केल्याचा उल्लेख असतो. तशी ही परंपरा आहे. प्रत्येक कर्म हे सद्‌गुरुंना अर्पण करावे, असा नियमच आहे. म्हणूनच तसे कसे केले जाते. पुस्तक लिहिले गेले, विचार मांडले गेले ते सद्‌गुरुंच्या कृपेमुळे सुचले. नव्हेतर ते सद्‌गुरुंनीच सुचविले असा भाव त्यामध्ये असतो. सद्‌गुरुंच्या भावातून जे प्रगटले. ते स्वतःचे आहे असे कसे म्हणता येईल. ते सद्‌गुरुंचेच आहे. सद्‌गुरुंना समक्ष भेटून जरी ते अर्पण करता आले नाही, तरी तो भाव मनात कायम असणे म्हणजे ते सद्‌गुरुंना समर्पित करण्यासारखेच आहे. समर्पण म्हणजे शरणांगती. शत्रू समोर पत्करलेली शरणांगती आणि सद्‌गुरूंच्या समोरील शरणांगती यामध्ये फरक आहे. याची गल्लत करु नये. शरण जाणे म्हणजे सर्वस्व घालविणे अशी मनाची दुर्बलता करून घेणे चुकीचे आहे. सद्‌गुरूंना शरण जाणे म्हणजे मन दुबळे होते. विचार दुबळे होतात असा अर्थ लावणे चुकीचे आहे. तसा विचार करणेही चुकीचे आहे. अध्यात्मात तसा त्याचा अर्थ नाही हे समजून घ्यायला हवे. सद्‌गुरु हे शत्रू नाहीत. मित्र आहेत. सहकारी आहेत. अशा थोर व्यक्तीच्या चरणी शरण जाणे हे सहजरित्या घडत नाही. याला काहीतरी अनुभव यावा लागतो. तरच हे घडते. देवाची आठवण ही कठीण प्रसंगी चटकण होते. इतर वेळी ही आठवण होईलच असे नाही. शरण जाणे आणि पराभूत होणे यामध्ये फरक आहे. शरण जाणे हा पराभव नाही. सद्‌गुरूंच्या अनुभवामुळे ही शरणांगती येते. जे पुस्तक आपण लिहीले ते विचार त्यांचे होते हा अनुभव जेव्हा येईल. तेव्हा ते पुस्तक त्यांचे आहे. त्यांनाच समर्पित करायला हवे. असा भाव सहजच मनात प्रगट होते. म्हणूनच धार्मिक पुस्तके ही सद्‌गुरुंना, भगवंताना अर्पण केलेली असतात. संशोधनाचे प्रबंध हे गुरुंना समर्पित करावेत. कारण ते गुरुंच्या कृपेमुळे त्यांच्या सहकार्यामुळेच ते पूर्ण झाले असतात. त्यांनीच तर ते शिकविले आहे. अशा गुरुंना तो प्रबंध समर्पित करायला हवा. अध्यात्म गुरु आणि प्रत्यक्ष शिक्षण देणारे गुरु यामध्ये फरक आहे. पण शेवटी ते गुरुच आहेत. गुरूंचा मान हा राखायलाच हवा. गुरु हे ज्ञानाचे सागर असतात. त्यांच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानातुनच तर शिष्याचा विकास होत असतो. यासाठी सद्‌गुरुंना समर्पण करण्याचा भाव सदैव मनामध्ये असावा. हा भाव कायम राहीला तर मीपणाची भावनाच राहणार नाही. अशा भावामुळेच आत्मज्ञानी होण्याचा मार्ग सुकर होईल.

Sunday, August 24, 2014

कर्मयोगपंथ

कर्मयोगपंथ । आक्रमोनि पार्था । चढे जो पर्वता । मोक्षरुप ।। 58 ।। अध्याय 5 वा
स्वामी स्वरुपानंद अभंग श्रानेश्‍वरी

जीवन जगायचे आहे तर त्यासाठी आवश्‍यक गोष्टी ह्या कराव्याच लागतात. ध्यानाला करतो आहे. म्हणून आयते जेवनाचे ताट कोणी समोर आणून ठेवणार नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी आवश्‍यक ते नियोजन हे जीवनात करावेच लागते. मादूगरी मागूण जीवन जगता येते. पण देणाऱ्याने शुद्ध अंतकरणाने दान द्यावे इतकी पात्रता त्या व्यक्तीमध्ये असावी लागते. यासाठीही कर्माची आवश्‍यकता आहेच. मंदिर उभारले, मशीदीही आता ठिकठिकाणी दिसत आहेत. चर्चची संख्याही वाढत आहे. चांगली गोष्ट आहे. पण अशा या ठिकाणी कोणते कर्म केले जाते. कोणता विचार जोपासला जातो. कोणती सेवा दिली जाते याला महत्त्व आहे. ही ठिकाणे समस्त मानव जातीच्या रक्षणासाठी आहेत. मानव जातीच्या विकासासाठी आहेत. मानव जातीचा विकास, आध्यात्मिक विचाराचा विकास हे त्यांचे कार्य आहे. हे कार्य तेथे चालत नसेल तर ही मंदिरे ओस पडतात. वेगळ्या विचारांनी लोक एकत्र येतात. काही काळ ही एकी टिकूण राहते. पण मंदिराचे उद्दिष्ट ते नसल्याने त्याचे पावित्र्य राहात नाही. अशा मंदिरांना मग जनताच पाठ फिरवते. गावात, शहरात अशी अनेक मंदिरे आहेत. सर्वच मंदिरात गर्दी असते असे नाही. गर्दी हवीच असेही नाही. पण मंदिराचे पावित्र्य टिकूण असायला हवे. मंदिर असो, मशिद असो, किंवा चर्च असो त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. यासाठी कर्म करावे लागते. तो कर्माचा मार्ग हा शांतीचा मार्ग आहे. समस्त मानव जातीच्या विकासाचा मार्ग आहे. नमस्कार सर्वच धर्मात करतात. फक्त प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे. पण मनातील विचार एकच आहे. सर्वच धर्म दुष्ट विचारांना विरोध करतात. समस्त मानव जातीतील दुष्ट विचार दूर व्हावेत हेच हे सर्व धर्म सांगतात. मानव जातीच्या रक्षणाचा विचार हाच धर्म आहे. ही ठिकाणे त्याच विचारांनी विकसित करायला हवीत. तेथे हेच कर्म करायला हवे. तरच मोक्षाचे स्वरूप विकसित होईल.

Monday, August 11, 2014

नामरुपाचा विस्तार

करी पार्था, नाम - ।
रुपाचा विस्तार । सर्वथा साचार । प्रकृतिच ।। 51 ।।

स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 7 वा

नामात काय आहे? आपण साधना करतो पण फक्त तोंडाने नाम उच्चारतो पण मनाने ते उच्चारत नाही. मन मात्र भटकत राहाते. नामावर त्याचे लक्ष केंद्रित नसते. नाम हे मनाने उच्चारायला हवे. तरच साधना होते. अन्यथा ती केवळ बडबड होते. स्वरूपाचे दर्शन घडायचे असेल तर नामाचा जप मनाने करायला हवा. मनात स्वरुप पहायला हवे. साधना करताना अनेक अडचणी येतात. कधी वेळच मिळत नाही. तर कधी सर्दी पडसे झालेले असते. अशा अनेक कारणांनी साधनेत व्यत्यय येत राहातो. पण साधना सोडायची नाही. या अडचणी ह्या क्षणिक असतात. आज सर्दी झाली आहे. उद्या वेळ नाही. परवा डोक दुखत आहे. अशी अनेक कारणे असतात. पण विचार केला तर ती सर्व क्षणिक असतात. मोठा आजार किंवा मोठा आघात झाल्यानंतर मात्र देव लगेच आठवतो. भीती पोटी देवाकडे आपण वळतो. तेव्हा देवाचे स्मरण होते. स्वाभाविक आहे. गरजेच्या वेळी तरी त्याचा आधार आहे असे वाटते. मनाला आधार मिळतो. पण गरज संपली की पुन्हा त्याचे विस्मरण होते. हे ही खरे आहे की साधना मारून मुरगुटून होत नाही. साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. जबरदस्तीने साधना करता येत नाही. पण मनाला साधनेला बसण्याची सवय लावावी लागते. ही सवय आपणास जरूर लागते. चांगल्या सवयी लागण्यास थोडा वेळ लागतो. धकाधकीच्या जीवनामुळे आता असल्या सवयी लागत नाहीत. फावला वेळच नसतो. असला तरी टि. व्ही. किंवा मोबाईलवर चॅटींग करण्यातच सारा वेळ जातो. वाचण्यासाठीही सध्या लोकांना वेळ नाही. मग देवाचे स्मरण करायला, साधना करायला वेळ कोठून येणार. पण एकक्षण जरी स्मरण केले तरी पुरेसे आहे. बसल्या बसल्या देव आठवला तरी दर्शन घडते. नामाचा एक शब्दही देवाचे दर्शन घडवतो. इतके नामामध्ये सामर्थ्य आहे. नाम देवाच्या रुपाचा विस्तार करते. आपण जरी देवाचे स्मरण केले नाही तरीही त्याचा उच्चार मात्र सतत सुरू असतो. सोऽहम, सोऽहम चा नाद सदैव सुरू असतो. फक्त आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान द्यायला हवे. आपले लक्ष नसले तरी ते सुरूच असते. सायकल चालवताना दोन्ही पायांची हालचाल सुरू असते. लक्ष जरी दुसरी कडे असले तरी ही क्रिया सुरू असते. मध्येच आडवा कोणी आला तर लगेच ही क्रिया थांबते. ब्रेक मारला जातो. तसे आपल्या शरीरातही सोऽहमचा नाद सुरू असतो. मन आपले फक्त दुसरीकडे धावत असते. आपण या नादाकडे लक्ष दिले तर तो नाद निश्‍चितच आपणाला ऐकू येतो. या नादात रमले तर त्याचा निश्‍चितच विस्तार होतो. स्वरुपाचे दर्शन घडते. फक्त हा स्वर आपण मनाने उच्चारायला हवा. मनाने ऐकायला हवा. मनाने जाणायला हवा. मन त्यामध्ये रमवायला हवे. तरच हे शक्‍य आहे.

Thursday, July 24, 2014

झुंज

म्हणोनियां देवा। जळो जळो झुंज । माने ना हें मज। कांही केल्या ।। 335 ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

ही झुंज कोणाशी आहे ? स्वतःच स्वतःशी ही झुंज आहे. पण मी पणामुळे ही झुंज नकोशी झाली आहे. हे माझं आहे? ते माझं आहे? या मोहाने लढण्याची इच्छाच नष्ट होऊ लागली आहे. धकाधकीच्या जीवनात साधना करायला वेळच नाही. एक-एक मिनिट मोलाचा झाला आहे. एक मिनिटात आपण साऱ्या जगभरात संदेश पोहोचवू शकतो. विकासाने इतका वेग घेतला आहे. विकासाच्या या वेगासोबत आपणाला राहावे लागणार आहे. हा वेग पकडला तरच उज्ज्वल भवितव्य घडणार आहे. हा वेग पकडण्यातच सगळा वेळ जात आहे. दैनंदिन जीवनात थांबायलाही वेळ नाही. अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. अशावेळी साधनेसाठी वेळ कसा देता येऊ शकेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झुंज देण्यास वेळच नाही. दररोजच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशावेळी आत्मज्ञानाचा विचार कसा येईल. ताज्या घडामोडीतच सगळा वेळ जात आहे. विश्रांती म्हणून फिरायला गेले तरीही तेथेही तेच सुरू होते. मोबाईल फोनमुळे सारे जीवनच व्यस्त झाले आहे. रेल्वेतून जाताना खिडकीतून डोकावायलाही वेळ नाही. निसर्गाचा स्वाद घेऊन मन मोकळे करायलाही वेळ नाही. जेवतानाही टिव्हीत डोकावतच जेवन होते. जेवनही त्याच विचारात होते. अशा धकाधकीच्या जीवनात साधनेचा विचार कसा येऊ शकेल. इतके व्यस्त जीवन झाले आहे. आत्मज्ञानासाठी झुंजण्याचा विचारच नकोसा झाला आहे. आत्मज्ञानी होऊन करायचे तरी काय? तिन्ही जगाचे ज्ञान घेऊन काय मिळवायचे? यापेक्षा नको ते आत्मज्ञान रोजचे जीवन धकाधकीचे असले तरी सुंदर आहे. सुखी आहे. या मोहाने आता आपण ग्रस्त झालो आहोत. जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास आपणास वेळच नाही. समजून घेऊन तरी काय करणार? अशा विचाराने आता लढण्याचे सामर्थ्यही उरलेले नाही. अशा विचाराने आपण आत्मज्ञानी होऊ ही आशाच आता संपली आहे. अशा या ग्रस्तव्यक्तिला स्वामीनी सल्ला दिला. स्वामी म्हणाले अरे तुला कोण लढायला सांगते, फक्त निमित्त मात्र तर तुला व्हायचे आहे. लढाई तर तू लढतच आहेस. फक्त या लढाईकडे तुला लक्ष द्यायचे आहे. तु नको म्हणालास तरी ही तुझी लढाई सुरूच आहे. सुरूच राहणार आहे. फक्त तुझे अवधान हवे आहे. श्‍वासाची ही लढाई थांबली तर तुझे जीवनच संपणार आहे. फक्त सुरू असणाऱ्या या लढाईकडे अवधान दे. दिवसातील काही क्षणजरी तू दिलेस तरी तुझा विजय निश्‍चित आहे. सोऽहम, सोऽहम चा अखंड स्वर हा सुरूच आहे. तो फक्त तुला तुझा कानांनी ऐकायचा आहे. मनाने तुला तो अनुभवायचा आहे. त्या स्वरावर तुला तुझे मन नियंत्रित करायचे आहे. त्या स्वरात डुंबायला शिक. म्हणजे तुझा आत्मज्ञानावर विजय निश्‍चित आहे. या लढाईत फक्त तु निमित्त मात्र हो.

Monday, January 13, 2014

इये मराठीचिये नगरी पुस्तकाला पुरस्कार

उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीसाठी देण्यात येणार चंद्रकुमार नलगे पुरस्काराचे वितरण रविवारी (ता. 12) स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशी झाले. इये मराठीचिये नगरी या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. माझ्या आयुष्यात असा पुरस्कार मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. नवोदित लेखकांना अशा पुरस्कारातून निश्‍चितच प्रोत्साहन मिळते. पुस्तक लिहीणे तसे सोपे वाटते पण पुस्तक प्रकाशित करणे यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. सद्‌गुरूंच्या कृपार्शिवादाने एका वर्षात माझी दोन पुस्तके झाली. पुढच्या पुस्तकांचेही नियोजन आहे. श्री ज्ञानेश्‍वर माऊलीच ही सेवा करुन घेत आहेत. लिहीत रहा लिहीत रहा. आपोआप पाहिजे त्या गोष्टी मिळत राहतील चिंता करू नकोस असा आर्शिवाद लाभत गेल्यानेच प्रोत्साहन मिळत गेले. आता या पुरस्कारामुळे तर ही श्रद्धा दृढ होत आहे. आधार देणारी माणसे भेटली की थोड हायसे वाटते. या पुरस्काराने कोणीतही आधार देणारे आहे असा विश्‍वास उत्पन्न झाला आहे. सध्या मराठी भाषेची पिछेहाट होते आहे असे म्हटले जाते. काही अंशी हे खरेही आहे. पण या भाषेत लिहीले जाणारे साहित्य वाचले जाते. त्याचे संवर्धन करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तिही आहेत. उजळाईवाडी येथील हे ग्रंथालय हे त्याचाच एक भाग आहे. या ग्रंथालयाने जोपासलेली ही चळवळ निश्‍चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात अशी चळवळ उभी करणे तितके सोपे नाही. गेली आठ वर्षे सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यभरातून लेखकांची मादिआळी येथे जमते. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी यातून निश्‍चितच प्रयत्न केला जातो. शासनाचाही यामध्ये सहभाग कौतुकास्पदच आहे. असे उपक्रम राबविणाऱ्या संस्थांची, साहित्यिकांची गरज आहे. असे कार्य करणारे, तळमळीने झटणारे साहित्यिकही फारच थोडे आहेत. पण त्यांच्या या कार्याला सहकार्य, प्रोत्साहानाची गरज आहे.

Saturday, January 4, 2014

कृषि ज्ञानेश्‍वरी

हातोटी

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ।।

गाय दुधाळ आहे. कासेला भरपूर दूध आहे. पण कासेतून दूध कसे काढायचे?
याचे तंत्रच अवगत नाही. मग दुधाळ गाय खरेदी करून दूध मिळणार आहे का? जनावरे
पाळायची आहेत. मग यासाठी आवश्‍यक ते शास्त्र जाणून घ्यायला नको का? ती कशी
पाळायची याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. जनावरांना चारा, पाणी किती द्यायचे कधी
द्यायचे. किती प्रमाणात द्यायचे हे सर्व माहित हवे. दुधाचे उत्पादन योग्य हवे तर योग्य ते
घटक जनावरांना द्यायला हवेत. त्याची वेळही ठरलेली असते. जनावरांच्या वाढीसाठी
आवश्‍यक मुलद्रव्ये द्यायला हवीत. खुराक कसा असावा किती प्रमाणात हवा याचेही
नियोजन हवे. तरच दुधाचे उत्पादन योग्य प्रमाणात होऊ शकेल. जनावरे सांभाळताना
त्याचे अर्थ शास्त्र जाणून घ्यायला हवे. जनावरांच्या खुराकावर किती खर्च होतो.
त्याच्या संगोपनासाठी एकूण खर्च किती येतो. त्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते का?
या उत्पादनातून योग्य तो नफा हाती लागतो का? याचे गणितही मांडता यायला हवे.
तोटा सहन करून कोणताही उद्योग चालत नाही. शेती हा एक उद्योग आहे. या दृष्टिकोन
डोळ्यासमोर ठेवून तो करायला हवा. जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. पण ती
पाळताना तोटा सहन करावा लागू नये याची काळजी घ्यायला नको का? जोडधंदा
हा मुख्य उद्योगाला हातभार लावण्यासाठी असतो. मुख्य पिकाला फटका बसला तर
त्या फटक्‍याची झळ शेतकरी कुटुंबाला बसू नये यासाठी जोडधंदे आहेत. व्यवसाय
करताना त्याचा प्रथम अभ्यास करायला हवा. या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्‍यक
ते नियोजन करायला हवे. तसा विचार करायला हवा. शेतात बी पेरले की ते उगवते.
पण ते कसे पेरायला हवे. उत्पादन अधिक येण्याच्या दृष्टीने कसे पेरायचे याचे
तंत्र जाणून घ्यायला हवे. केळीचे पीक 40 ते 45 महिने उत्पादन देते. खोडवा,
निडवा याचे योग्य व्यवस्थापन करून हा कालावधी कमी करता येतो. विशेष म्हणजे
उत्पादनही तेवढेच ठेवून. हे नवे तंत्र आत्मसात करून शेती करायला हवी. तीसमहिन्यात केळीचे खोडवा, निडवा घेता आला तर उरलेल्या कालावधीत एखादे
पीक सहज घेता येणे शक्‍य आहे. घड कोणत्या बाजूला पडतो त्याच्या विरुद्ध
दिशेला पहिल्या पिकाचे घड तयार होण्याआधीच खोडवा ठेवून पिकाचा कालावधी
कमी करता येतो. असे नवे तंत्र आत्मसात करायला हवे. तसेच असे नवे तंत्रस्वतः शोधायला हवे. नियोजनातून, अभ्यासातून होणाऱ्या चुका दुरुस्त करत उत्पादन
वाढीवर भर दिला तर शेतीमध्ये निश्‍चितच प्रगती होऊ शकेल. शेती कशी करायची
याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यासकेला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी
कसा होईल?

12...........................................................................कृषि ज्ञानेश्‍वरी

ठिबक सिंचन

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे ।
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।

झाडाची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्याच्या मुळाशी पाणी द्यावे लागते
हा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. यावरून त्याकाळात झाडांची,
रोपांची वाढ कशी होते. त्याला अधिकाधिक फळे लागावीत, उत्पन्न भरघोस यावे
यासाठी प्रयत्न हे केले गेले होते. ठिबक सिंचन हे आज प्रगत शेतीचे तंत्रज्ञानसमजले जात असले तरी बाराव्या शतकातही हेच तंत्र वापरून शेती केली जात होती.
फक्त त्या काळातील सिंचनाची पद्धत वेगळी होती. मडक्‍याच्या तळाशी छोटे छिद्र
पाडून ते मडके झाडाच्या, रोपाच्या मुळाशी पुरले जायचे. तेव्हा विद्युत मोटार किंवा
पंपही नव्हते. पाणी दुरून आणून घालावे लागत होते. ही पुरलेली मडकी पाण्याने
भरली जायची. मडक्‍याच्या छिद्रातून हळूहळू पाणी झाडाच्या मुळापर्यंत झिरपते. अशा
पद्धतीने पाणी दिले जायचे थेट झाडाच्या मुळांशी पाणी देण्याची पद्धत त्याकाळात
अवगत होती. खतेही याच पद्धतीने दिली जात होती. झाडाच्या भोवती गोलाकार रिंग
करून सेंद्रिय खत पेरले जायचे. पुढील काळात मोटेचा शोध लागला. मोटेने पाणी
खेचले जाऊ लागले. त्यानंतर पंपाने पाणी खेचण्याचा शोध लागला. वाट्टेल तेवढे
पाणी विहिरीतून खेचता येऊ लागले. तसे पाण्याचा वाट्टेल तसा वापर होऊ लागला.
अशाने शेतांना मीठ फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न
झाल्याने त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे, पण तरीही आज पाटानेच पाणी
देण्याची पद्धत शेतकरी वापरत आहेत. उत्पादन घट होऊनही, जमीनीचा पोत बिघडला
जात असूनही शेतकरी पिकांना पाटानेच पाणी देण्याची पद्धत वापरत आहे. शास्त्रोक्त
पद्धतीने आज शेती केलीच जात नाही, याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.
पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजच आहे हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या
शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या
जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी
देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा
शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. दररोज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत
व्हावा यासाठी ज्ञान विस्ताराचे कार्य केले जाते. ठिबकचा वापर शेतीत वाढावा
यासाठी शासनाचे अनुदानही उपलब्ध आहे, पण तरीही शेतकरी याचा वापर करत
नाहीत. आता शेतकऱ्यांनी हा आळस झटकून शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला हवी
तरच भावी काळात शेती टिकून राहणार आहे. याचा विचार करायला हवा.

कृषि ज्ञानेश्‍वरी............................................................................13

सुक्षेत्र

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।

शेतात टाकले की उगवते. उत्पादन मिळते. जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
पेरले की थेट काढणीलाच शेतात जाणारेही अनेक शेतकरी आहेत. अशाने आता
शेती तोट्याची झाली आहे. ही मानसिकता बदलायला हवी. कोकणात तसेच पश्‍चिम
घाटमाथ्यावर भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करून त्या शेतात हरभरा विस्कटून
टाकण्याची पद्धत आहे. काढणीनंतर परतीचा पाऊस पडला तर हा हरभरा जोमात
उगवतो. तीन महिन्यात हरभरा काढणीला येतो. पेरणीनंतर थेट काढणीलाच शेतकरी
शेतात जातात. फारसे कष्ट न घेता हरभऱ्याचे उत्पादन हाती लागते. आजही ही पद्धत
रूढ आहे. एकरी एक-दोन पोती उत्पादन होते. चार जणांच्या शेतकरी कुटुंबाला
वर्षभर हे धान्य पुरते, पण शास्त्रोक्त पद्धतीने हरभरा लागवड केली तर एकरी पाच
पोती उत्पादन मिळते. अडीच पट अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
हवा. यात आळस नको. क्षेत्रात लागवड नको तर सुक्षेत्रात लागवड हवी. जमीनीची
नांगरट योग्य प्रकारे केलेली असावी. ओळीमध्ये ठराविक अंतरावर पेरणी केलेली
असावी. इतकेच नव्हे तर संत ज्ञानेश्‍वरांनी बी पेरताना ते किती खोलीवर पेरावे याचेही
शास्त्र सांगितले आहे. पिकाची योग्य निगा राखली जावी. त्याच्यावर पडणाऱ्या
कीड-रोगांचा बंदोबस्त करायला हवा. उत्पादन वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या
उपाययोजना करायला हव्यात. खते, पाणी वेळेवर द्यायला हवे. बरेच शेतकरी असे
म्हणतात. असे करण्यासाठी पैसा लागतो. खर्च वाढतो. उत्पादन आले तरी खर्च
वाढतो. सुक्षेत्रात जोमदार पिकात कीड-रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. याचा
विचार कोण करत नाही. यासाठीच याचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांनी अभ्यासायला हवे.
खर्च खरंच किती होतो. उत्पादन किती टक्‍क्‍यांनी वाढते. हे विचारात घ्यायला हवे.
जमाखर्च मांडला तरच समजेल शेतीत कोणत्या सुधारणा करायला हव्यात. खर्चावर
नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय योजावेत यावर विचार होऊ शकेल. शेती हा जर
धंदा आहे तर मग धंदेवाईक दृष्टिकोन का नको? शहरात फेरफटका मारायला जाताना
कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी
काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा
करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार
का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी
सुक्षेत्र का नको? यात टंगळामंगळ व्हायला नको. आळस हाच माणसाचा खरा शत्रू
आहे. आळसाने कोणतेही काम होत नाही. आळस झटकून देऊन काम करण्याची वृत्ती
हवी, तरच प्रगतीच्या वाटा सापडतील.

14..........................................................................कृषि ज्ञानेश्‍वरी

भाजलेले बी

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तशी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।।

पावसाळ्यानंतर डोंगरावर वाढलेले गवत वाळते. या गवताला आग लावली
तर त्या धगीमध्ये अनेक वृक्ष, रोपे नष्ट होतात. गवताचे बीजही करपून निघते. अशा
या वनव्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर ओसाड होताना पाहायला मिळत आहेत. आगीत
भाजलेले बी अंकुरत नाही. हाच विचार घेऊन शेतजमीनी भाजण्याचाही प्रयोग अनेक
शेतकरी करतात. शेतात तणांचा प्रादुर्भाव अधिक वाढला असेल तर, उन्हाळ्यामध्ये
शेत जमीन भाजून घेतात. नांगरट करून सूर्याच्या धगीत जमीन शेकवली जाते. पिकाचे
उरलेले अवशेष पाला पाचोळा शेतात जाळून जमीन शेकवली जाते. या धगीत तणांचे
बी शेकले जाते. भाजलेले हे बी अंकुरत नाही. कीड-रोगांचेही बीजांडे नष्ट होतात.
साहजिकच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव झालेल्या
शेतात ही पद्धत वापरली जाते. शेतात आग केल्याने जमिनीतील आवश्‍यक जिवाणूही
नष्ट होतात. यामुळे आता जमिन भाजण्याची किंवा शेकण्याची पद्धत आता वापरली
जात नाही. त्याऐवजी तण कुजविण्याची पद्धत रूढ झाली आहे. जमीन शेकविण्याऐवजी
वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट
कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब
उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. सेंद्रिय कर्बामुळे
जमीनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. पिकांच्या वाढीला जोर मिळतो. पीक
जोमात असेल तर त्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. निरोगी शरीरात जशी
रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते तसेच जोमात वाढलेल्या पिकांमध्येही रोगप्रतिकार
शक्ती अधिक असते. तणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या शेतात भरघोस उत्पन्नाची अपेक्षा
करणे चुकीचे आहे. पण फुलोरा येण्यापूर्वी हेच तण शेतात कुजविले तर सेंद्रिय
घटकांच्या निर्मितीचा पिकाला फायदा होऊ शकेल. ताग, ढेच्या ही हिरवळीची खते
जशी शेतात कुजविली जातात तशी तणही कुजविली जाऊ शकतात. ताग, ढेच्या
लवकर कुजतात. त्यामुळे ते कार्यक्षम घटक जमिनीत निर्माण करू शकतात. तसे तण
कुजण्यास जरी वेळ लागला तरी त्यातूनही कार्यक्षम घटक तयार होऊ शकतात. तण
देई धन हा विचार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रताप चिपळूणकर शेती करत आहेत.
त्यांचा आदर्श घेऊन राज्यात अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. बदलत्या
शेतीपद्धतीत सेंद्रिय खताचा तुटवडा जाणवत आहे. जनावरांची संख्या घटल्याने याचा
फटका सेंद्रिय खताच्या निर्मितीवर झाला आहे. सेंद्रिय खताचा वापरच शेतामध्ये
केला जात नाही. अशाने जमिनी नापिक होण्याचा धोकाही बळावला आहे. शेतांची
उत्पादकता झपाट्याने घटताना दिसत आहे. जमिन पिकाऊ राहिली तरच शेती टिकेल.
यासाठी ती पिकाऊ ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारे उपायही योजने गरजेचे आहे.

कृषि ज्ञानेश्‍वरी............................................................................15

विचारी पक्षी

देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगे नरु केवीं तैसा । पावे वेगां ।।

पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीची बारीक निरीक्षणे केली जात होती. पक्ष्यांचे
गुण काय आहेत? तो कसा वागतो? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? तो कसा
विचार करतो? तो कोठे राहातो? तो कसा राहतो? स्वतःचे स्वतः कसे उपचार करतो?
समुहाने राहतो की एकटा राहातो? त्याचे स्थलांतर? आदी सर्व गोष्टींचा अभ्यास केला
जात होता. अशा या निरीक्षणातूनच पक्षांचे संरक्षण व पिकाचे पक्षांपासून संरक्षण यावर
उपाय निश्‍चित केले होते. जगा व जगू द्या हा विचार जोपासला जात होता. आता
हा विचार मागे पडला आहे. पिकांचे पक्षांपासून संरक्षण करताना गोफन वापरली
जायची. शेतात बुजगावणे उभे केले जायचे. हे उपाय हे निरीक्षणातूनच शोधले गेले
होते. यामध्ये पक्षाला कोठेही इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेलेली आढळते.
गोफणीने फक्त पक्षी हुसकावून लावले जायचे. पक्षी पिकांकडे येणार नाहीत यासाठी
बुजगावणे उभारले जायचे. काही ठिकाणी गोंगाट केला जायचा. आवाजामुळे पक्षी
पळून जावेत हा त्यामागचा उद्देश होता. ढोल, टिमकी वाजवली जायची. यामध्ये पक्षी
ठार मारण्याचा कोणताही उपाय नव्हता. फळे खातात, पिकातील दाणे खातात म्हणून
थेट त्यांना ठार मारा असा कोणताही उपाय येथे नव्हता. पण सध्याच्या युगात असा
विचार मांडला जात नाही. उपाय योजताना हा विचार केलाच जात नाही. नुकसान
होते ना? मग रोखण्यासाठी त्यांना ठार मारणे ही गरज आहे असाच विचार केला
जातो. पक्षी असो कीटक असो याचा समुळ नायनाटच केला जात आहे. रसायनांच्या
फवारण्यामुळे फक्त कीटकच मरतात. असा दावा केला जातो. पण त्याचे अनेक
दुष्परिणाम होत आहेत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर
विचारही आता बदलत चालले आहेत. अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या
विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात
आहे. पण जीवन चक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या
उत्पन्न होणार आहेत. झटपट जीवनशैलीमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. आत्ताची
गरजच विचारात घेतली जाते. पुढील काळात त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेतयाचा विचारच केला जात नाही. पक्षाला फळ दिसले, तर तो लगेचच फळाकडे धाव
घेत नाही. एका फांद्यावरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहातो. सर्व बाजूंनी फळाचे
निरीक्षण करतो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. हळूहळू फळाकडे
धाव घेतो. पण माणूस मात्र झटपट फळाची अपेक्षा करतो. पक्षाला विचार आहे, पण
मानवाला हा विचार जोपासता येत नाही. हे दुर्दैव्यच म्हणावे लागेल. प्रयत्न करत
राहिले तर यश मिळते. झटपट यशाची अपेक्षा ठेवू नये.

Thursday, January 2, 2014

प्रा. नलगे ग्रंथालयातर्फे पुरस्कार

प्रा. नलगे ग्रंथालयातर्फे जानेवारीत पुरस्कारांचे वितरण
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयामार्फत दिला जाणारा ग्रंथपुरस्कार प्रदान सोहळा 12 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध मराठी कादंबरीकार प्रा. वसंतराव बोधे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा येथील नामवंत लेखकांनी मोठ्या प्रमाणात आपले ग्रंथ पाठविले होते. ग्रंथपुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये डॉ. विश्‍वनाथ शिंदे (सावळजकरांचा तमाशा), प्रा. सुहासकुमार बोबडे (अग्निकुंड), जयश्री बापट (जीवन संगीत), दिवाकर गंधे (जीवन-एक उत्सव), अशोक चिटणीस (हृदयस्थ), देवराज कामटवार (आयुष्य पडद्यामागचे), रामदास कामत (आम्ही बी घडलो), "सकाळ'चे उपसंपादक राजेंद्र घोरपडे (इये मराठीचिये नगरी), सिसिलिया कार्व्हालो (थुई थुई), रमेश तांबे (खिडकी), रजनी हिरळीकर (बोधकथा), बाळासाहेब तोरस्कर (प्रीतफूल), प्रा. डॉ. जे. के. पोवार (पत्र पावलेली अन्‌ भावलेली), विठ्ठल आप्पाजी भोसले (विठ्ठलायन) आदींचा समावेश आहे.